सांगोला : टेंभू उपसा सिंचन प्रकल्पातून माण नदीला सोडलेले पाणी १५ मेपर्यंत प्रत्यक्षात नदीत पोहोचणार आहे.
७५० दल घ. फूट (पाऊण टीएमसी) पाण्यातून माण नदीवरील बलवडी ते मेथवडेपर्यंत दोन दरवाजे टाकून बंधारे भरून दिले जाणार आहेत.
शेतकऱ्यांनी पाणी काटकसरीने वापरण्याचे आवाहन टेंभू उपसा सिंचन प्रकल्प व्यवस्थापन ओगलेवाडी यांनी केले आहे. उन्हाच्या तीव्रतेमुळे माण नदीसह बंधाऱ्यातील पाणी आटले.
शेतीच्या पाण्यासह जनावरे, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. शेतकऱ्यांनी टेंभू उपसा सिंचन योजनेतून माण नदीत पाणी सोडण्याची मागणी लोकप्रतिनिधींकडे केली होती.
शेतकऱ्यांच्या मागणीची दखल घेऊन टेंभू योजनेतून माण नदीला उन्हाळी आवर्तनाचे पाणी सोडावे अशी मागणी आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी २८ एप्रिल रोजी लेखी पत्र देऊन जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे केली होती.
माजी खासदार रणजित सिंह निंबाळकर यांनीही १ मे रोजी कार्यकारी अभियंता यांच्याशी संपर्क साधून टेंभूतून माण नदीत पाणी सोडण्याची मागणी केली होती.
दरम्यान सांगोला शाखा व कवठेमहांकाळ शाखेचे उन्हाळी आवर्तन बंद केले आहे. त्यामुळे टेंभू उपसा सिंचन प्रकल्पातून १ मे रोजी ४०० क्युसेक विसर्गाने पाणी घाणंद तलाव मार्गे कामत तलावात सोडले होते.
दोन्ही तलाव ओव्हरफुल्ल झाल्याने सध्या आटपाडी तलावात पाणी चालू आहे. हा तलाव ओव्हरफुल्ल झाल्यानंतर आटपाडी ओढ्यातून पुढे १५ ते १६ मे रोजी प्रत्यक्ष पाणी माण नदीत पोहचणार आहे. ऐन उन्हाळ्यात माण नदीला पाणी सोडल्याने मोठा दिलासा मिळणार आहे.
५ टक्के पिण्यासाठी तर ५ टक्के शिल्लक
◼️ टेंभू सिंचन प्रकल्प व्यवस्थापन विभागाला पाणीपुरवठा करणाऱ्या कोयना धरणात सध्या २६ टीएमसी पाणीसाठा उपलब्ध आहे.
◼️ यापैकी ५ टक्के पिण्यासाठी तर ५ टक्के शिल्लक वजा जाता १६ टीएमसी पाणी शेती पिकांसाठी मिळणार आहे.
टेंभू उपसा सिंचन प्रकल्पातून सांगोला शाखेला एक महिना उन्हाळी आवर्तनाचे पाणी दिले. सद्यस्थितीत कवठेमहांकाळ व सांगोला शाखेचे उन्हाळी आवर्तन बंद झाले आहे. त्यामुळे घाणंद कामत तलाव ओव्हरफुल्ल झाल्याने आटपाडी तलावातून ४०० क्युसेक वेगाने पाणी १५ मेपर्यंत माण नदीत येणार आहे. - राजन डवरी, कार्यकारी अभियंता, टेंभू उपसा सिंचन, ओगलेवाडी
अधिक वाचा: १०० गोणी कांद्याला मिळाले १४०० रुपये; हतबल झालेल्या शेतकऱ्याने २ एकरातील कांदा दिला पेटवून
