बदलत्या हवामानाचा मोठा फटका पारंपरिक शेतीला बसत आहे. पावसाचे अनिश्चित स्वरूप आणि मजुरांच्या कमतरतेमुळे जिल्ह्यातील शेतकरी आता पारंपरिक नाचणी आणि वरई या पिकांपासून दूर जाऊ लागला आहे.
परिणामी, जनावरांसाठी लागणाऱ्या चाऱ्याचा (पेंढ व गवत) प्रश्न गंभीर झाला असून, त्याचे दर गगनाला भिडले आहेत. एकेकाळी गावपातळीवर सहज उपलब्ध होणारा पेंढ आता 'मिळेल का?' असे म्हणण्याची वेळ पशुपालकांवर आली आहे.
सिंधुदुर्गात भात हे मुख्य पीक असले तरी, नाचणीच्या कडब्याला जनावरांसाठी सकस चारा मानले जाते. मात्र, नाचणीचे क्षेत्र घटल्याने चाऱ्याचा तुटवडा निर्माण झाला आहे.
पावसाळी भात कापणीनंतर मिळणारा पेंढा साठवणे आता पावसाच्या लहरीपणामुळे कठीण झाले आहे, ज्यामुळे दुग्ध व्यावसायिक आणि पशुपालक चिंतेत पडले आहेत. आता उन्हाळा सुरू झाल्याने चाऱ्याचा प्रश्न आणखीनच गंभीर होणार आहे.
मुरघास आणि मका कुटीचा आधार
◼️ चाऱ्याच्या टंचाईवर मात करण्यासाठी जिल्ह्यातील काही प्रगतशील शेतकरी आता मका लागवडीकडे वळत आहेत.
◼️ मका हा मुरघासासाठी फायदेशीर ठरत आहे. मक्याची कुटी तयार करून जनावरांना खाऊ घालण्यावर भर दिला जात आहे, मात्र त्याचे प्रमाण अजूनही मर्यादित आहे.
नाचणीची शेती झाली दुर्मीळ
◼️ नाचणी हे पीक अत्यंत कष्टाचे आणि कापणीसाठी मजुरांवर अवलंबून असणारे आहे.
◼️ कापणी आणि मळणीची प्रक्रिया किचकट असल्याने शेतकरी या पिकाकडे पाठ फिरवत आहेत.
◼️ नाचणीचा चारा दुभत्या जनावरांसाठी उत्तम असतो, मात्र लागवड घटल्याने हा सकस चारा आता दिसेनासा झाला आहे.
वाहतुकीचा खर्च वाढला
इंधन दरवाढीमुळे चाऱ्याच्या वाहतुकीचा खर्च दुप्पट झाला आहे. तालुक्यांतर्गत एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पेंढा नेण्यासाठी वाहन भाडे जास्त मोजावे लागत असल्याने किरकोळ विक्रीमध्ये पेंढ्याचे दर सर्वसामान्य शेतकऱ्याला परवडणारे राहिलेले नाहीत.
पेंढ्याच्या पेंढीला सोन्याचा भाव
◼️ सध्या भाताच्या पेंढ्याची टंचाई भासत आहे. वाहतूक खर्च आणि मजुरी वाढल्याने पेंढ्याच्या दरात ३० ते ४० टक्क्यांनी वाढ झाली आहे.
◼️ प्रति शेकडा पेंढ्याचे दर आता ३ हजार ५०० ते ४ हजार रुपयांपर्यंत पोहोचले आहेत.
◼️ बाहेरून चारा भागवणे शेतकऱ्यांच्या आवाक्याबाहेर जात आहे.
जंगली जनावरांचा उपद्रव वाढला
◼️ भातासह नाचणी पिकाला आता माकडे आणि रानडुकरांचा मोठा उपद्रव सहन करावा लागत आहे.
◼️ पक्ष्यांच्या वाढत्या त्रासामुळेही कणसे वाचवणे कठीण होते.
◼️ नुकसान टाळण्यासाठी शेतकरी पेरणीच करत नाहीत, ज्यामुळे प्रत्यक्ष पिकाबरोबरच चाऱ्याचे उत्पादनही बुडत आहे.
अधिक वाचा: सुकामेवा बाजारात खजूरला सर्वाधिक मागणी; वाचा कोणत्या सुकामेव्याला काय सुरु आहे दर?
