भारताचे युवा खेळाडू स्वत:ला सिद्ध करण्यास सज्ज

कोलंबो : रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारताचा युवा संघ मंगळवारी तिरंगी निधास टी-२० कप स्पर्धेच्या सलामी लढतीत श्रीलंकेच्या आव्हानाला सामोरे जाणार आहे.

पुढील वर्षी होणा-या विश्वकप स्पर्धेत निवड समितीचे लक्ष वेधण्याची युवा खेळाडूंना संधी आहे. यंदाच्या मोसमात भारताने श्रीलंकेविरुद्ध मायदेशात व श्रीलंकेत १८ आंतरराष्ट्रीय (६ कसोटी, ८ वन-डे आणि ४ टी-२०) सामने खेळले आहेत.

बांगलादेश या मालिकेत सहभागी झालेला तिसरा संघ आहे. भारताने या मालिकेसाठी आघाडीच्या सहा खेळाडूंना विश्रांती दिली आहे. त्यामुळे युवा खेळाडूंना स्वत:ला सिद्ध करण्याची संधी आहे.

रिषभ पंत, दीपक हुड्डा व मोहम्मद सिराज यांचा संघात समावेश आहे. आयसीसी विश्वकप स्पर्धेला केवळ १६ महिन्यांचा कालावधी शिल्लक असून प्रत्येक खेळाडू निवड समितीचे लक्ष वेधण्यास प्रयत्नशील आहे.

भारतीय संघाने जास्तीतजास्त वेळा श्रीलंका संघाला पराभूत केले आहे. कार्यवाहक कर्णधार रोहित शर्माकडे जेतेपद पटकावण्याची चांगली संधी आहे. दक्षिण आफ्रिका दौ-यात निराशाजनक कामगिरीनंतर रोहित शर्माला सूर गवसण्याची आशा आहे.