गणेश चतुर्थी: ५ हजार वर्षांपासून पार्थिव गणपती पूजन; कशी सुरु झाली परंपरा? वाचा, काही तथ्य

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2023 07:34 AM2023-09-18T07:34:07+5:302023-09-18T07:34:07+5:30

Ganesh Chaturthi 2023: पार्थिव गणपती पूजनाबाबत पुराणात काही संदर्भ आढळून येतात, असे म्हटले जाते. वाचा, पौराणिक कथा...

ganesh chaturthi 2023 know how parthiv ganpati puja tradition has been started to performed for 5 Thousand years and relation to mahabharata | गणेश चतुर्थी: ५ हजार वर्षांपासून पार्थिव गणपती पूजन; कशी सुरु झाली परंपरा? वाचा, काही तथ्य

गणेश चतुर्थी: ५ हजार वर्षांपासून पार्थिव गणपती पूजन; कशी सुरु झाली परंपरा? वाचा, काही तथ्य

googlenewsNext

Ganesh Chaturthi 2023: भाद्रपद महिन्यातील चतुर्थीला पार्थिव गणेश पूजन केले जाते. एका मान्यतेनुसार, श्रीगणेशाच्या अवतारांपैकी गुणेश याचा जन्म भाद्रपद शुद्ध चतुर्थीला झाला. महादेव शिवशंकरांनी कैलास पर्वतावर भाद्रपद शुद्ध चतुर्थीला याच दिवशी जन्मोत्सव साजरा केला होता. असे काही दाखले पुराणांमध्ये आढळतात. मंगळवार, १९ सप्टेंबर रोजी अंगारक योगात गणेश चतुर्थी आहे. यापुढे १० दिवस गणेशोत्सव साजरा केला जाईल. प्राचीन काळापासूनची पार्थिव गणपती पूजनाची परंपरा कशी सुरू झाली? जाणून घेऊया...

एका पौराणिक कथेनुसार, महाभारताची रचना महर्षी व्यासांनी केली. हे महाभारत महर्षी व्यासांनी महादेव आणि पार्वती देवीचे पुत्र गणपतीकडून लिहून घेतले. घराघरात पार्थिव पूजनाची सुरुवात तेव्हापासून झाली, असे म्हटले जाते. महाभारताची रचना करताना महर्षी व्यास आणि गणपती यांनी एकमेकांना काही अटी घातल्या होत्या. गणपतीला आपल्या लेखनाच्या गतीबाबत आत्मविश्वास होता. गणपती महर्षी व्यासांना म्हणाले की, तुम्ही महाभारत कथा हळूहळू सांगणार असाल, तर मला कंटाळा येईल. त्यामुळे तुम्ही न थांबता सलग गोष्ट सांगावी. ही अट आपणास मान्य असेल, तर आणि तरच लेखनाची जबाबदारी मान्य करेन, अशी अट गणपतीने घातली.

...आणि लेखनाचा श्रीणेशा झाला

व्यास महर्षी होते. गणपतीच्या अटीवर त्यांनी केवळ स्मित हास्य केले. महर्षी व्यास गणपतीला म्हणाले की, आपली अट मला मान्य आहे. मात्र, मी सांगितलेल्या वाक्याचा अर्थ समजला, उमगला, तरच ते वाक्य लिहून पूर्ण करायचे. अन्यथा अर्थ समजेपर्यंत थांबायचे, अशी अट महर्षी व्यासांनी ठेवली. गणपती तयार झाले आणि लेखनाचा श्रीगणेशा केला. महर्षी व्यास नेमके काय सांगताहेत हे समजून घ्यायला अनेकदा गणपतीला विलंब व्हायला लागला. संपूर्ण महाभारत कथा समजून लिहून घेण्यासाठी तब्बल तीन वर्षांचा कालावधी लोटला, असे सांगितले जाते.

गणपतीच्या सर्वांगावर मातीचा लेप लावण्यात आला

महाभारत कथा पूर्ण होण्यात मोठा कालावधी लोटला. कित्येक दिवस एकाच ठिकाणी बसल्यामुळे गणपतीचे शरीर आखडून गेले. गणपतीच्या शरीरातील उष्णताही वाढायला लागली. वाढत जाणाऱ्या उष्णतेवर उपाय म्हणून गणपतीच्या सर्वांगावर मातीचा लेप लावण्यात आला. हा लेप लावून लावून जाडसर झाला. त्याला टणकपणा येऊन त्याने गणरायाच्या मूर्तीचा आकार घेतला. महाभारताची कथा लिहून पूर्ण झाल्यानंतर ही माती झटकून विसर्जित करण्यात आली. तेव्हापासून गणपतीचा सन्मान करण्यासाठी गणपतीची मातीची मूर्ती घडवून तिचे पूजन करण्याची परंपरा सुरू झाली, अशी एक कथा सांगितली जाते.

​पेशवे काळ आणि घरगुती गणेशोत्सव

सवाई माधवरावांनी घरगुती गणेश पूजनाला उत्सवाचे मोठे रूप दिले. हा उत्सव भव्य स्वरूपात शनिवारवाड्यातील गणेश महालात भाद्रपद शुद्ध चतुर्थीपासून ते दशमीपर्यंत साजरा केला जाऊ लागला, असे म्हटले जाते. दरबारातील अन्य मानकऱ्यांनीसुद्धा या कल्पनेचे स्वागत केले. शनिवारवाड्यातून फुला-पानांनी सजवलेल्या पालखीतून गणेशमूर्तीची वाजतगाजत मिरवणूक काढण्यात येऊ लागली. शनिवारवाड्याजवळच उत्तरेच्या दिशेला असणाऱ्या नदीप्रवाहात गणेशमूर्तीचे विसर्जन करण्यात येऊ लागले. सुरुवातीला दीड दिवस, पाच दिवस, दहा दिवस असा उत्सव होता. आजच्या काळातही ही वाटचाल सुरू असल्याचे दिसून येते. लोकमान्य टिळकांच्या देशकार्यात गणपतीला देशा-परदेशात महत्त्व प्राप्त झाले. सदर माहिती सामान्य गृहीतके आणि मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जाते.
 

Web Title: ganesh chaturthi 2023 know how parthiv ganpati puja tradition has been started to performed for 5 Thousand years and relation to mahabharata

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.