घरात वॉटर प्युरिफायर नसला तरी पाणी स्वच्छ ठेवण्याचे अनेक पारंपरिक आणि सोपे उपाय आपल्या संस्कृतीत पूर्वीपासून आहेत. आज जरी आधुनिक फिल्टर्स आणि आरओ यंत्रे उपलब्ध असली, तरी ग्रामीण भागात आणि पूर्वीच्या काळात लोक नैसर्गिक साधनांचा वापर करून पाणी स्वच्छ करत असत. (Water can be purified even without a filter - 4 traditional methods, cheap and very easy to do)योग्य पद्धतीने केल्यास या उपायांनी पाण्यातील घाण, जंतू आणि अशुद्धी मोठ्या प्रमाणात कमी करता येतात.
सर्वात सोपी आणि प्रभावी पद्धत म्हणजे पाणी उकळणे. पाणी किमान दहा ते पंधरा मिनिटे चांगले उकळले तर त्यातील बहुतांश जंतू नष्ट होतात. उकळलेले पाणी पूर्ण थंड झाल्यावर झाकण लावून स्वच्छ भांड्यात साठवावे. ही पद्धत विशेषतः पावसाळ्यात किंवा संसर्गजन्य आजारांचा प्रसार होत असताना उपयुक्त ठरते.
पाणी गाळण्याची पारंपरिक पद्धतही खूप वापरली जायची. स्वच्छ कापडाच्या अनेक घड्या करून त्यातून पाणी गाळले जात असे. यामुळे पाण्यातील धूळ, माती आणि दिसणारे कण दूर होतात. काही ठिकाणी वाळू, गोटे आणि कोळसा यांच्या थरांचा वापर करून साधे घरगुती फिल्टर तयार केले जात असत. या थरांमधून पाणी हळूहळू गाळले की त्यातील अशुद्धी कमी होते. शाळेतही हा प्रयोग अनेकांनी केला असेल.
तांब्याच्या भांड्यात पाणी साठवण्याची पद्धतही आपल्या पूर्वजांनी चालवली. तांब्यामध्ये नैसर्गिक जंतुनाशक गुणधर्म असल्याचे मानले जाते. रात्री तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी सकाळी पिणे आरोग्यास हितकारक मानले जाते. त्याचप्रमाणे मातीच्या मडक्यात पाणी ठेवण्याची पद्धतही उपयुक्त आहे. मातीच्या भांड्यामुळे पाणी नैसर्गिकरीत्या थंड राहते आणि चवही सुधारते.
काही ग्रामीण भागात पाण्यात तुरटी (फिटकरी) फिरवून ठेवण्याची पद्धत आजही वापरली जाते. फिटकरी पाण्यातील गाळ खाली बसवण्यास मदत करते. काही वेळाने वरचे स्वच्छ पाणी अलगद काढून वापरले जाते. मात्र ही पद्धत करताना प्रमाण योग्य ठेवणे आवश्यक असते. हातात किंवा रुमालात तुरटीचा खडा घ्यायचा आणि पाणअयात गोलाकार किमान २० वेळा फिरवायचा. नंतर पाण्याला धक्का न लावता पाणी शांत होऊ द्यायचे.
