भारताची खाद्यसंस्कृती ही विविध प्रदेशांच्या परंपरा, श्रद्धा आणि स्थानिक जीवनशैली यांचा सुरेख संगम आहे. गणतंत्र दिनाच्या निमित्ताने राष्ट्रपती भवनात आयोजित करण्यात आलेल्या हाय-टी कार्यक्रमात हीच विविधता अधोरेखित करण्यात आली. देशाच्या वेगवेगळ्या भागांतील निवडक पारंपरिक पदार्थ या मेनूमध्ये समाविष्ट करण्यात आले होते. त्यामध्ये उत्तर-पूर्व भारतातील त्रिपुरातील दोन पारंपरिक गोड पदार्थांचा समावेश करण्यात आला. त्रिपुरा हे भारतातील प्रसिद्ध ठिकाण आहे. फक्त सौंदर्यासाठीच नाही तर खाद्य संस्कृतीसाठीही ते ठिकाणी प्रसिद्ध आहे.
हाय-टी कार्यक्रम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत पार पडला. भारतातील प्रादेशिक खाद्यपरंपरांचा सन्मान करण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमात विविध राज्यांतील वैशिष्ट्यपूर्ण पदार्थ समाविष्ट करण्यात आले. तज्ज्ञांमार्फत निवडण्यात आले. त्याच अनुषंगाने त्रिपुराची ओळख सांगणारे हे दोन गोड पदार्थ पाहुण्यांना वाढण्यात आले.
पहिला पदार्थ म्हणजे माताबारी पेढा. हा त्रिपुरातील त्रिपुरा सुंदरी, म्हणजेच माताबारी मंदिराशी जोडलेला पारंपरिक गोड पदार्थ आहे. अनेक पिढ्यांपासून हा पेढा मंदिरातील प्रसाद म्हणून तयार केला जातो आणि स्थानिक धार्मिक व सामाजिक परंपरेचा अविभाज्य भाग आहे. दूध, साखर आणि तूप यांपासून केला जाणारा हा पेढा साध्या चवीचा असतो. या पेढ्याला भौगोलिक निर्देशांक अर्थात GI tag मिळालेला असून, त्यामुळे त्याची ओळख आणि पारंपरिक पाककृती पद्धत अधिकृतरीत्या संरक्षित झाली आहे. हा टॅग माताबारी पेढ्याचे त्रिपुराशी असलेले ऐतिहासिक आणि भौगोलिक नाते अधोरेखित करतो.
पातीशाप्त पीठा हा देखील त्रिपुरा तसेच आसपासच्या पूर्वोत्तर प्रदेशात केला जाणारा असलेला पारंपरिक गोड पदार्थ आहे. भाताच्या कणकेपासून केलेल्या पातळ पिठीमध्ये नारळ, खवा किंवा गूळ यांचे गोड सारण भरुन हा पिठा तयार केला जातो. सणासुदीच्या काळात आणि विशेष प्रसंगी हा पदार्थ घरोघरी केला जातो. साधी रचना, सौम्य गोडवा आणि स्थानिक साहित्य यामुळे पातीशाप्त पीठा या प्रदेशातील पारंपरिक खाद्यसंस्कृतीचे प्रतिनिधित्व करणारा ठरला.
राष्ट्रपती भवनातील हाय-टी कार्यक्रमात माताबारी पेढा आणिपातीशाप्त पीठा यांचा समावेश होणे म्हणजे त्रिपुराच्या स्थानिक खाद्यपरंपरेला राष्ट्रीय पातळीवर स्थान मिळणे असे म्हणता येईल. या माध्यमातून केवळ दोन गोड पदार्थ नव्हे, तर त्या मागे असलेली परंपरा, श्रद्धा आणि प्रदेशाची ओळख देशासमोर मांडली गेली.
