भारतात पूर्वी तांबे, चांदी, पितळ, कांस्य, लोखंड किंवा मातीच्या भांड्यांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जात असे. आज स्टील आणि प्लास्टिकची भांडी सर्वत्र दिसत असली तरी पारंपरिक धातुंच्या भांड्यांचे महत्त्व अजूनही कमी झालेले नाही. उलट नैसर्गिक आणि आरोग्यदायी जीवनशैलीकडे लोक पुन्हा वळत असल्यामुळे या भांड्यांविषयी उत्सुकता वाढताना दिसते.
तांब्याच्या भांड्यात रात्रभर ठेवलेले पाणी सकाळी उपाशीपोटी पिण्याची सवय अनेक घरांत आजही आढळते. तांबे हा नैसर्गिकरित्या जंतूनाशक गुणधर्म असलेला धातू मानला जातो. पाण्यातील काही सूक्ष्म जंतूंवर त्याचा परिणाम होऊ शकतो. (Silver-brass-copper and clay - see the benefits of cooking in traditional pots -don't use coated pots)तसेच तांब्याचे पाणी पचनक्रिया सुधारण्यास मदत करते, शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर टाकण्यास सहाय्यक ठरते आणि त्वचेची चमक वाढवण्यास हातभार लावते. तांब्याचे दाहशामक गुणधर्म सांधेदुखी आणि सूज कमी करण्यास मदत करु शकतात. मात्र तांब्याच्या भांड्यातील पाणी मर्यादित प्रमाणातच घ्यावे आणि ते जास्त वेळ साठवून ठेवू नये, याची काळजी घेणे आवश्यक आहे.
चांदीच्या भांड्यांनाही आपल्या परंपरेत विशेष स्थान आहे. लहान मुलांना चांदीच्या वाटीतून अन्न देण्याची पद्धत पूर्वी प्रचलित होती. चांदी शीतल स्वभावाची असल्याचे मानले जाते, त्यामुळे ती शरीराला थंडावा देण्यास मदत करते. चांदीमध्येही जंतूनाशक गुणधर्म असल्याचे सांगितले जाते. उन्हाळ्यात चांदीच्या ग्लासमधील पाणी पिणे किंवा चांदीच्या भांड्यातून अन्न घेणे शरीरासाठी हितकारक मानले जाते. तसेच रोगप्रतिकारक शक्ती सुधारण्यासही चांदी मदत करु शकते.
पितळ आणि कांस्य या मिश्रधातूंची भांडीही पूर्वी मोठ्या प्रमाणावर वापरली जात. पितळ हे तांबे आणि जस्त यांचे मिश्रण असून त्यात जंतूंची वाढ तुलनेने कमी होते. कांस्य हे तांबे आणि कथील यांचे मिश्रण आहे आणि आयुर्वेदानुसार कांस्य भांड्यातून अन्न घेतल्यास पचन सुधारते व शरीरातील दोष कमी होतात. मात्र या भांड्यांत आम्लयुक्त पदार्थ जास्त वेळ ठेवणे टाळावे आणि त्यांची योग्य पद्धतीने स्वच्छता करणे आवश्यक असते.
मातीची भांडीही आरोग्यासाठी उपयुक्त मानली जातात. मातीच्या मडक्यात ठेवलेले पाणी नैसर्गिकरित्या थंड राहते, कारण मातीतील सूक्ष्म रंध्रांमधून होणाऱ्या बाष्पीभवनामुळे पाण्याला गारवा मिळतो. प्लास्टिकच्या तुलनेत मातीची भांडी अधिक सुरक्षित आणि पर्यावरणपूरक पर्याय मानली जातात.
लोखंडी भांड्यांमध्ये शिजवलेले अन्न शरीराला लोह मिळवून देण्यास मदत करू शकते. विशेषतः ज्यांचे हिमोग्लोबिन कमी असते, त्यांच्यासाठी लोखंडी कढईत केलेले अन्न उपयुक्त ठरू शकते. त्यामुळे प्लास्टिकपेक्षा पारंपरिक भांडी वापरणे जास्त फायद्याचे आहे.
