Viral News : लग्न हा प्रत्येक व्यक्तीच्या जीवनातील सगळ्यात खास क्षण असतो. त्यामुळे हा दिवस आई-वडील, नातेवाईक, मित्र परिवाराशिवाय पूर्णच होऊ शकत नाही. या सगळ्यांच्या उपस्थितीत लग्नाचे रिती-रिवाज होण्याचा आनंद काही वेगळाच असतो. खासकरून मुलींसाठी हे क्षण खूप खास असतात. पण अलिकडे एका तरूणीने इन्स्टाग्रामवर पोस्ट करून सांगितले की, तिने तिच्या सख्ख्या आईलाच लग्नात बोलवलं नव्हतं. या तरूणीच्या पोस्टवर सध्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. आधी तर लोकांना वाटलं की, असं करण्यामागे काही छोटं-मोठं कारण असेल. पण जेव्हा तरूणीने यामागचं खरं कारण सांगितलं तेव्हा सोशल मीडिया यूजर्स दोन भागात विभागले गेले. चला तर जाणून घेऊया तरूणीने स्वत:च्या आईला लग्नात न बोलवण्याचं कारण...
इन्स्टाग्रामवर तरूणीने नवरीच्या लूकमधील फोटो शेअर करत लिहिले की, 'मी माझ्या आईला माझ्या लग्नात बोलवलं नाही....'. तरूणीचं नाव एरियाना ग्रिमाल्डी आहे आणि ती अमेरिकेच्या टेक्सासमध्ये राहते. तरूणीला दोन मुलंही आहेत. तरूणीची ही कहाणी तिच्या लग्नाची नाही तर बालपणीच्या जखमांची आणि तिला देण्यात आलेल्या मानसिक त्रासाची आहे. ज्याकडे सामान्यपणे बरेच लोक दु्र्लक्ष करतात.
एरियानाने इन्स्टाग्राम पोस्टवर लिहिलं की, 'मी माझ्या आईला लग्नात बोलवलं नाही. हे माझ्यासाठी काही सोपं काम नव्हतं. हा माझ्या जीवनातील सगळ्यात अवघड निर्णय होतो. हा निर्णय यासाठी नव्हता की, माझ्या मनात काही राग किंवा द्वेष होता. ना माझ्या मनात काही सूड घेण्याची भावना होती. मी हा निर्णय घेतला कारण माझं पूर्ण बालपणा त्या व्यक्ती हातून मार खाण्यात गेलं, ज्याची मला सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी होती'.
'लोक फार सहजपणे बोलतात की, ती तुझी आई आहे. त्यांना हे नाही कळत की, घरात मोठे असण्याचा अर्थ प्रत्येकवेळी भितीच्या वातावरणात जगावं लागतं. आपल्याच घरात आपल्याला असुरक्षित असल्याचं जाणवतं. आपल्याला आपल्यातच विश्वास राहत नाही. या काळात आपल्याला हेही माहीत नसतं की, आपण नेमके कोण आहोत'.
'भावनात्मक वेदना, मानसिक त्रास, शारीरिक शोषण, कमी लेखणं, एकटेपणा, भीती आणि लाज...या गोष्टी विसरल्या जाऊ शकत नाही, कारण तुमचं त्या व्यक्तीसोबत रक्ताचं नातं असतं. मी खूप प्रयत्न केले. मी माफही केलं. मी अनेक वर्ष गप्प राहिले. पण स्वत:ला या ट्रॉमातून बाहेर पडण्यासाठी मला एक सीमा आखणं गरजेचं होतं'.
पुढे ती म्हणाली की, 'माझा लग्नाचा दिवस प्रेम, शांती आणि सुरक्षेसाठी होता. दिखावा करण्याचा नाही आणि किंवा कुणाला आनंदी ठेवण्याचा नव्हता. माझ्या आयुष्यात ही पहिलीच वेळ होती, जेव्हा मी स्वत:ला कोणत्याही गिल्टशिवाय स्वीकारलं होतं. तसेच एक आई म्हणून मला हेही वाटतं की, मुलांना प्रेम मिळायला हवं. सुरक्षा त्यांचा अधिकार आहे'.
'मी हे कुणाच्याही सहानुभूतीसाठी लिहित नाहीये. हे मी अशा लोकांसाठी लिहितेय, जे एकटेपणात जगले. त्यांच्यासाठी ज्यांना गप्प राहणं शिकवलं गेलं. त्यांच्यासाठी हे आजही शिकत आहेत की, मेंटल हेल्थबाबत चिंता करणं चुकीचं नाहीये. स्वत:ला ठीक करण्यासाठी आपल्या लोकांना दूर केल्याने आपण वाईट ठरत नाही'.
बऱ्याच लोकांनी या तरूणीचं समर्थन केलं आणि तिच्या ईमानदारीचं कौतुकही केलं. तर बऱ्याच लोकांनी त्यांच्या आई-वडिलांसोबत असलेल्या तणावपूर्ण नात्याचे अनुभवही शेअर केले.
