Empty Nest Divorce: हल्ली नात्यांसंबंधी वेगवेगळे नवीन ट्रेंड बघायला मिळताहेत. नात्यांच्या वेगळ्याच कॉन्सेप्ट आपल्या जीवनात प्रवेश करत आहेत. डिव्होर्स म्हणजेच घटस्फोट हे आपल्याला माहीत आहेच. पण अलिकडे एम्प्टी नेस्ट डिव्होर्सचा देखील ट्रेंड वाढलेला दिसतोय. एम्प्टी नेस्ट डिव्होर्स म्हणजे जेव्हा मुलं किंवा मुली शिक्षणासाठी वा नोकरीसाठी घर सोडतात, त्यानंतर कपल वेगळे होण्याचा निर्णय घेतात. अनेक वर्ष जबाबदाऱ्यांच्या ओझ्याखाली जो दुरावा लपून राहिलेला असतो, तो मुलं बाहेर पडल्यानंतर स्पष्ट दिसू लागतो. हा ट्रेंड शहरांमध्ये वाढत असल्याचं बोललं जातं, ज्यामुळे नात्यांबाबत मोठा प्रश्न उभा राहतो.
काय आहे एम्प्टी डिव्होर्स?
एम्प्टी नेस्ट डिव्होर्सचा सोपा अर्थ असा आहे की, रिकामं घरटं आणि तुटत असलेलं नातं. जेव्हा मुलं लहान असतात तेव्हा आई-वडील त्यांच्या गरजांवर पूर्णपणे फोकस करतात. त्यांना काय हवं-नको ते बघत असतात. शिक्षण, फी, ट्यूशन, आजार, लग्न, करिअर अशा कितीतरी स्तरांवर धावपळ सुरू असते. या धावपळीत काही पती-पत्नीचं एकमेकांसोबत बोलणंही कमी होतं. संवाद कमी झाला की, हळूहळू नातं केवळ जबाबदारी बनून राहतं. पुढे जेव्हा मुलांची जबाबदारी संपते किंवा कमी होते तेव्हा अनेक कपल्स नातंही कमजोर पडतं. त्यामुळे एम्प्टी नेस्ट डिव्होर्सचा ट्रेंड हल्ली वाढलेला बघायला मिळतो. खासकरून मोठ्या शहरांमध्ये.
मुलं दूर गेल्यावर दुरावतं नातं
जेव्हा मुलं मोठी होतात शिक्षण किंवा नोकरीसाठी दुसऱ्या शहरांमध्ये जातात किंवा लग्नानंतर आपला वेगळा संसार थाटतात, तेव्हा घरात केवळ दोन लोक राहतात. ते म्हणजे आई-वडील. तेव्हा पालकांना अशी जाणीव होते की, त्यांच्याकडे बोलण्यासाठी काही राहिलंच नाहीये. अशात त्यांना जुनी भांडणं आठवू लागतात आणि छोट्या छोट्या गोष्टींवरून तक्रारी वाढू लागतात. अनेक कपल्सना असं वाटतं की, आता सोबत राहण्यात काहीच अर्थ राहिलेला नाही.
का वाढतोय हा ट्रेंड?
एम्प्टी नेस्ट डिव्होर्स वाढण्याचं सगळ्यात मोठं कारण भावनिक दुरावा मानला जातो. अनेक वर्ष केवळ आई-वडिलांची भूमिका निभावणारे लोक पती-पत्नीची भूमिका विसरतात. त्यांच्या सवयी वेगळ्या होतात, विचार वेगळे होतात आणि त्यांच्यात मुलांशिवाय दुसऱ्या कोणत्या विषयावर फार बोलणंही होत नाही. सोशल मिडिया आणि बदलती लाइफस्टाईलही याला कारणीभूत आहे. लोक आपल्या स्वत:च्या आनंदाला जास्त महत्व देऊ लागले आहेत. जर त्यांना नात्यात आनंद जाणवत नसेल तर ते काडीमोड घेण्याचा निर्णय लगेच घेतात. कारण त्यांच्याकडे मुलांची जबाबदारी राहिलेली नसते.
कशी वाढवता येईल जवळीकता?
असं गरजेचं नाही की, प्रत्येक कपल आपली मुलं दूर गेल्यानंतर वेगळे होतात. अनेक कपल्स सोबत राहूनही वेळ घालवण्याचा प्रयत्न करू शकतात. ही स्थिती सांभाळण्याचे अनेक मार्ग आहेत. पती-पत्नीने मुलं घर सोडून गेल्यावर एकमेकांना वेळ द्यायला हवा. सोबत फिरायला जायला हवं, जुन्या आठवणींना उजाळा द्यायला हाव आणि ज्या गोष्टी बोलायच्या राहिल्या त्या बोलायला हव्या. काही केसेसमध्ये जर स्थिती जास्तच बिघडली असेल तर काउन्सेलिंगचा पर्यायही निवडला जाऊ शकतो.
