मोबाईल स्क्रीनवर चमकणारं एक जादुई जग, बॅकग्राऊंडला वाजणारं शांत कोरियन संगीत आणि ती 'परफेक्ट' जीवनशैली—आजच्या काळात 'K-Culture' चं हे रील मुलांसाठी केवळ मनोरंजन उरलं नसून एक धोकादायक वेड बनलं आहे. एखाद्या देशाला जाणून घेण्याची किंवा तिथे फिरण्याची इच्छा असणं सामान्य आहे, परंतु भारतात आज ही ओढ एका अशा जीवघेण्या व्यसनात बदलली आहे, जी हसत्या-खेळत्या कुटुंबांना उद्ध्वस्त करत आहे.
या डिजिटल वेडाचा सर्वात भयानक चेहरा गाझियाबादमध्ये पाहायला मिळाला, जिथे तीन मुलींनी 'कोरियन वर्ल्ड'च्या काल्पनिक जाळ्यात अडकून आपलं जीवन संपवलं. ही घटना सावध करत आहे की, मुलं आता फक्त व्हिडीओ पाहत नाहीत, तर त्या स्क्रीनच्या आतील आभासी जगालाच आपलं खरं वास्तव मानू लागली आहेत. कोरियाला जाण्याची आणि तशीच जीवनशैली जगण्याची इच्छा एखाद्या निरागस मुलाच्या मनावर ताबा मिळवते.
गाझियाबादच्या 'भारत सिटी सोसायटी'मधील नवव्या मजल्यावरील १५, १४ आणि १२ वर्षांच्या तीन अल्पवयीन बहिणींनी गॅलरीतून खाली उडी मारली. पोलिसांच्या प्राथमिक तपासात जे समोर आलं धक्कादायक आहे. या तिन्ही बहिणी कोरियन संस्कृती आणि संगीताशी भावनिकदृष्ट्या इतक्या जोडल्या गेल्या होत्या की, त्या स्वतःला भारतीय मानण्यासही तयार नव्हत्या. त्या अनेकदा म्हणायच्या, "तुम्ही लोक इंडियन आहात, आम्ही तर कोरियन आहोत." जेव्हा घरच्यांनी त्यांचे हे वेड पाहून मोबाईल काढून घेतला, तेव्हा त्यांच्यासाठी तो केवळ फोनचा विरह नव्हता, तर त्यांनी मोबाईल स्क्रीनवर वसवलेल्या संपूर्ण काल्पनिक जगाचा अंत होता.
K-Culture चा प्रवास
कोरियन ड्रामाच्या मनाला स्पर्श करणाऱ्या कथा, तिथल्या कलाकारांची मोहक शैली, चमकणारी त्वचा आणि एक असं जग जिथे सर्वकाही सुंदर आणि शिस्तबद्ध दिसतं. आजच्या नवीन पिढीसाठी ही केवळ पाहण्याची गोष्ट उरलेली नाही. याच कारणामुळे अनेक मुलं आता कोरियन भाषा शिकत आहेत, त्यांच्यासारखे कपडे घालू इच्छितात, तशाच प्रकारचे अन्न खाऊ इच्छितात आणि सोल शहराप्रमाणे आपले आयुष्य जगण्याचा प्रयत्न करत आहेत. इन्स्टाग्राम रील्स हा परिणाम अधिक तीव्र करत आहेत, जिथे दोन मिनिटांत एका 'परफेक्ट लाइफ'चं स्वप्न दाखवलं जातं. हळूहळू मुलांच्या मेंदूतील 'रील' आणि 'रिअल' यांमधील फरक पुसला जाऊ लागतो.
दोष कोणाचा? संस्कृतीचा की आपल्या दुर्लक्षाचा?
'कोरियन संस्कृती वाईट आहे' असं म्हणणं खूप सोपं आहे. पण सत्य ते नाही. कोणताही चित्रपट किंवा संगीत ही एक कला असते. समस्या तेव्हा सुरू होते जेव्हा मुलं आपली ओळख, आपली नाती आणि आपल्या वास्तवापासून तुटून फक्त स्क्रीनच्या त्या झगमगत्या दुनियेत जगू लागतात, जिथे रीलमधील आयुष्य सोपं वाटतं आणि खऱ्या आयुष्यातील आव्हानं खूप जड वाटू लागतात.
गाझियाबादची ही घटना एक मोठा इशारा आहे. मुलांच्या ऑनलाईन जगाला हलक्यात घेणं किती धोकादायक ठरू शकतं, हे यातून स्पष्ट होतं. थोडक्यात सांगायचं तर, गरज या गोष्टीची आहे की पालकांनी फक्त फोन हिसकावून घेऊ नये, तर मुलांशी संवाद साधावा. शाळेने फक्त पुस्तकी ज्ञान न देता मुलांच्या मनातील गोष्टीही ऐकून घ्याव्यात. या घटनेने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.
