मुलं, नाती, घर, करिअर, समाज, जबाबदार्या या सगळ्यांमध्ये स्वतःसाठी वेळ उरत नाही. कामांची यादी कधीच संपत नाही आणि त्यातच सतत काहीतरी विचार सुरू असतात. हे झालं का?, उद्या काय करायचं?, मी काही चुकले तर? या सततच्या विचारांमुळे मन थकून जातं. त्यातूनच चिडचिड, अस्वस्थता आणि मानसिक ताण वाढतो. अतिविचार ही फक्त परिस्थिती नसते, ती हळूहळू सवय होते. (Why Do Women Seem Constantly Irritated? The Real Reason Behind Women’s Anger)त्यामुळे डोकं शांत ठेवणं ही केवळ गरज नाही, तर मानसिक आरोग्यासाठी अत्यावश्यक बाब आहे.
डोकं शांत ठेवण्यासाठी सर्वात आधी जर थांबण्याची आणि शांत बसण्याची सवय लावा. दिवसभरात किमान १०–१५ मिनिटे फक्त स्वतःसाठी राखून ठेवा. त्या वेळेत फोन, सोशल मीडिया, काम या सगळ्यापासून दूर राहा. खोल श्वास घेण्याचा सराव खूप परिणामकारक ठरतो. चार सेकंद श्वास आत घेणे, चार सेकंद रोखून ठेवणे आणि हळूहळू सोडणे, हा साधा श्वसनव्यायाम मेंदूला शांत करतो.
अतिविचार कमी करण्यासाठी विचार कागदावर लिहिण्याची सवय फायदेशीर ठरते. मनातल्या चिंता कागदावर उतरवल्या की त्या थोड्या हलक्या होतात. त्यातील काही गोष्टी आपल्या नियंत्रणात आहेत, तर काही नाहीत हे स्पष्ट दिसते. ज्या गोष्टी आपल्या हातात नाहीत, त्यांना स्वीकारण्याचा प्रयत्न करा. कामाची घाई आणि परिपूर्णतेचा अट्टाहास चिडचिड वाढवतो. त्यामुळे 'टू-डू लिस्ट' वास्तववादी ठेवा. एकाच वेळी सगळं करण्याऐवजी प्राधान्यक्रम ठरवा. मदत मागण्यात कमीपणा नाही, घरातील जबाबदाऱ्या वाटून घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे.
शारीरिक हालचाल मानसिक शांततेसाठी अत्यंत उपयुक्त असते. हलका व्यायाम, योग किंवा चालणे यामुळे ताण कमी होतो आणि मूड सुधारतो. नियमित झोप हीसुद्धा महत्त्वाची आहे. अपुरी झोप ही चिडचिडीचे एक मोठे कारण ठरते. स्वतःला आवडणाऱ्या कामांमध्ये वेळ घालवणेही आवश्यक आहे. वाचन, संगीत, बागकाम किंवा मैत्रिणींशी मनमोकळा संवाद. या गोष्टी मनाला सकारात्मक ऊर्जा देतात. सतत इतरांसाठी धावपळ करताना स्वतःच्या आनंदाकडे दुर्लक्ष होऊ देऊ नका.
जर चिडचिड खूप वाढत असेल, रडू येत असेल, झोप लागत नसेल किंवा सतत चिंता वाटत असेल तर तज्ज्ञांचा सल्ला घेणे योग्य ठरते. मानसिक आरोग्य ही लाजिरवाणी गोष्ट नसून ती जपण्याची गोष्ट आहे. त्यामुळे मला वेडी म्हणतील किंवा मानसिक संतुलन नाही समजतील असे काही विचार न करता बिनधास्त तज्ज्ञांशी संवाद साधा.
महिलांनी हे लक्षात ठेवायला हवे की त्या यंत्र नाहीत. थकवा येणे, चिडचिड होणे किंवा मन अस्वस्थ होणे हे नैसर्गिक आहे. स्वतःला थोडं थांबवा, मोकळा श्वास घ्या आणि स्वतःवर प्रेम करा. यातच खरी शांतता दडलेली आहे. डोकं शांत ठेवणं म्हणजे समस्यांपासून पळ काढणं नव्हे, तर त्यांना स्थिर मनाने सामोरे जाण्याची ताकद मिळवणं होय. आणि ही ताकद प्रत्येक स्त्रीमध्ये आहे, फक्त तिला ती ओळखण्याची गरज आहे.
