भारतात एखादा उत्सव येणार म्हणजे फक्त त्या दिवशी जल्लोष नसतो, उत्सव जसाजसा जवळ येत जातो तसतसे वातावरण काही वेगळ्याच रंगाचे व्हायला लागते. आनंद, उत्साह अशा प्रेरणादायी भावना उफाळू लागतात. गणपती, दहीहंडी अशा उत्सवांची तयारी तर महिनाभर आधीच सुरु होते. मग डोक्यातले विचार ते हेडफोन्स मधले गाणे सारे त्यात सणाविषयीच. (The beautiful story of Dahi Handi celebrated in the Konkan, celebrating in traditional way)दहीहंडीसाठी गोविंदा पथके जोरदार सराव करतात. 'बजरंग बली की जय' असे म्हणत थरावर थर चढवले जातात. सगळीकडे गोकुळाष्टमी अशीच तर साजरी होते हो ना ? तर नाही प्रत्येक गावाची आपली वेगळी परंपरा आहे. आजकाल शहरातून होणाऱ्या दहीहंडीच्या कार्यक्रमांमध्ये विचित्र गाणी लावली जातात. मोठाले डीजे, स्पिकर असल्याशिवाय सण साजरा होतच नाही. एवढेच नाही तर अश्लील चाळे करत नाचणाऱ्या महिलांशिवाय दहीहंडीला मजा उरलेली नाही. शहरांची ही स्थिती असताना आजही गावांकडे संस्कृती जपत सण साजरे केले जातात. गावात साजरे केले जाणारे सण काही वेगळेच असतात असे म्हटले जाते आणि ते सत्यच आहे कारण सणांची खरी गरज, ओढ त्यामागील हेतू आजही गावाकडची मंडळी जाणून आहेत. कोकणातील अनेक गावांमध्ये आजही जुन्या पद्धतीने हा दहीहंडीचा उत्सव साजरा केला जातो.
सकाळी लवकर उठून वाडीतले सारे बाळगोपाळ हातात कळशी आणि डोक्यावर हांडे घेऊन दूध-दही-ताक-लोणी असे ओरडत घरोघरी फिरतात. दारात उभी असलेली आजी हंड्यात काय ओतते ते पाहायची उत्सुकता मुलांच्या डोळ्यातून दिसते. जे काही हंड्यात पडेल ते गोड मानायचे आणि त्यातला लोण्याचा गोळा पटकन उचलून खाऊन टाकायचा. असेच सगळ्यांकडून विविध पदार्थ गोळा केल्यावर गावच्या मंदिरात साठवलेला काला घेऊन जायचे. मग त्यातला काला हंडीत भरायचा. वरती नारळ ठेवून हंडी घट्ट बांधायची. तीन ते चार थराची हंडी बांधाली की मग खऱ्या मस्तीला सुरवात होते.
दुपारी सगळे देवळात एकत्र जमतात. 'बांबूला बांबू चिकटवला आणि बघणाऱ्यांना फटकला' असे गात कोकणातील पारंपरिक नृत्य करतात. ना कोणती चित्रपटातली गाणी लावली जात ना मोठा स्पिकर. सगळे मिळून कृष्णाची पारंपरिक गाणी ढोलकीच्या तालावर गातात आणि मनसोक्त नाचत घरोघरी जातात. वाडीतल्या प्रत्येक घरातून वेगवेगळा प्रसाद दिला जातो. कोणी वाटली डाळ देते तर कोणी साबुदाणा खिचडी. गरमागरम चहा, कॉफी, मसाला दूध तर असतेच. गरम आणि गार पाण्याच्या बादल्या दारोदारी भरून ठेवलेल्या असतात. नाचणाऱ्यांवर पाण्याचा वर्षाव करत 'गोविंदा रे गोपाळा' असे म्हणत पूर्ण संध्याकाळ पाण्यात भिजत वाडीतून फेऱ्या मारल्या जातात. शेवटी काळोख पडायला लागल्यावर घरी जाऊन पटकन आवरुन, पुन्हा देवळात जमायचे आणि गोपाळकाल्याचा आस्वाद घ्यायचा. गरमागरम साधी खिचडी खायची. दिवसभर दह्यात माखून झाल्यावर त्या रात्री लागणारी झोप शब्दात व्यक्त करणे कठीणच.