एकदा नाही दोनदा लग्न मोडलं माझं, त्याचं कारण काय असेल? तर माझं इमोशनल शटडाऊन, जोडीदाराला हवं तेव्हा मी नव्हतोच मनानं तिथं. कामात स्वत:ला इतकं झोकून दिलं की ना मी घरात होतो ना नात्यात, ना इमोशनली अव्हेलेबल होतं. माझं हे असं इमोशनल शटडाऊन होणंच, माझ्या नात्यातली गडबड होती. नातं म्हणून तुटलं हे आता मला कळतंय. (Both my marriages broke up! Aamir Khan reveals the terrible consequences of emotional shutdown)आमीर खानने एका मुलाखतीत हे मोकळेपणानं मान्य केलं. इमोशनल शटडाऊन म्हणजे काय हा प्रश्न अनेकांना ते ऐकून पडलाच असेल..
तर इमोशनल शटडाऊन, संकल्पना ऐकायला नवी वाटली तरी त्यात काही नवीन नाही. तुम्ही आम्हीही बरेचदा असेच वागत असतो, फरक एवढाच ते मान्य करण्याची हिंमत आमीर खानमध्ये आहे, आपल्याकडे असतेच असं नाही.
इमोशनल शटडाऊन म्हणजे, एकप्रकारे बंद करुन टाकणं ती भावना. आयुष्यात काही वेळा आपण एखाद्या गोष्टीचा विचार करण्यापेक्षा ती गोष्ट आयुष्यात नाहीच, तो प्रश्न नाही, ते सुखदु:ख नाही असं वागणं. ही अशी मानसिक अवस्था आहे जिथे एखादी व्यक्ती अचानक किंवा हळूहळू आपल्या भावना व्यक्त करणं बंद करते. बाहेरुन ती व्यक्ती शांत, उदास किंवा दुःखी वाटू लागते, पण आतून ती मानसिक थकलेली असते. ताण किंवा वेदना सहन करत असते. स्वतःला जपण्यासाठी मेंदू वापरत असलेली एक संरक्षणात्मक प्रतिक्रिया (defense mechanism) मानली जाते. मात्र ती जास्त काळ चालली तर त्याचा परिणाम काही चांगला होत नाही.
इमोशनल शटडाऊन साधारणपणे ताण, सततचा मानसिक दबाव, भावनिक धक्का, नातेसंबंधातील त्रास किंवा दीर्घकाळ दुर्लक्षित झालेल्या भावनांमुळे होतो. जेव्हा भावना व्यक्त करणे खूप वेदनादायक, गोंधळात टाकणारे किंवा असुरक्षित वाटते, तेव्हा मेंदू आपोआप भावना लपवण्याचा मार्ग निवडते. ही क्रिया एवढी प्रभावी होते की फक्त इतरांना प्रतिसाद देण बंद करता करता स्वतःलाही काही जाणवणे बंद होते आणि ते पटकन लक्षातही येत नाही.
या अवस्थेत व्यक्तीला आनंद, दुःख, राग किंवा उत्साह काहीच नीट जाणवत नाही. काहीही वाटत नाही. सगळं बोथट झाल्यासारखं आहे किंवा मला फरकच पडत नाही अशी वाक्ये ती व्यक्ती सतत वापरते. इतरांशी संवाद कमी होतो, जवळच्या लोकांपासून दुरावल्यासारखे वाटते आणि स्वतःच्या भावनांशी संपर्क तुटल्याची जाणीव होते. काही जणं या स्थितीला इमोशनल बॅलंस, सेल्फ रियलायझेशन किंवा मुव्ह ऑन होणे समजतात, मात्र तसे नसून ही पेचात पाडणारी मानसिक स्थिती आहे. भावना हा आयुष्याचा भाग आहे. त्या अनुभवणे आणि व्यक्त होणे हे श्वास घेण्याएवढेच महत्त्वाचे आहे. त्यामुळे तुमचेही कधी इमोशनल शटडाऊन होत असेल तर ते होऊ न देता, व्यक्त व्हा. वेळेप्रसंगी तज्ज्ञांकडेही जा. मानसिक आरोग्य छान राहण्यासाठी याची गरज असते.
