आज मुली प्रत्येक क्षेत्रात चांगली कामगिरी करत आहेत, नाव कमवत आहेत, पण एक काळ असा होता जेव्हा मुलींचं जग त्यांच्या घरापुरत मर्यादित होतं. त्यांच्या मुख्य जबाबदाऱ्या कुटुंब, घरकाम आणि मुलांची काळजी घेणं या होत्या, परंतु जसजसा काळ बदलला तसतशी परिस्थिती देखील सुधारू लागली. आता मुली बहुतेक क्षेत्रात मुलांपेक्षा चांगलं काम करत आहेत. अशाच एका महिलेबद्दल जाणून घेऊया जिने लग्न आणि मूल झाल्यानंतर तिचं स्वप्न साकार केलं आणि यामध्ये तिच्या पतीने आणि सासरच्यांनी तिला पूर्ण पाठिंबा दिला.
संघ लोकसेवा आयोग (यूपीएससी) ही देशातील सर्वात कठीण परीक्षांपैकी एक आहे, जी परीक्षा दरवर्षी हजारो विद्यार्थी देतात, परंतु केवळ काहींनाच यश मिळतं. अशा परिस्थितीत जर तुमच्यावर कुटुंब आणि मुलांची जबाबदारी असेल तर हा प्रवास आणखी कठीण होतो, परंतु लग्नाच्या ४ वर्षांनंतर पुष्पलता यादव यांनी आपला पती आणि सासरच्यांच्या पाठिंब्याने UPSC सिव्हिल सर्व्हिस परीक्षा उत्तीर्ण केली आणि IAS पदावर नियुक्ती झाली.
पुष्पलता यादव यांचा जन्म हरियाणातील एका छोट्या गावात झाला. सुरुवातीचं शिक्षण गावातच झालं. त्या अभ्यासात खूप हुशार होत्या. १२ वी नंतर पुष्पलता यांनी पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण देखील घेतलं. पदव्युत्तर पदवीनंतर खासगी नोकरी करायला सुरुवात केली, त्याचबरोबर सरकारी नोकरीची तयारीही सुरू केली, परंतु २०११ मध्ये त्यांचं लग्न झालं. दोन वर्षांनी त्यांना एक मुलगा झाला आणि काही काळ मुलाची काळजी घेण्यात त्या व्यस्त होत्या. जेव्हा मुलगा २ वर्षांचा झाला, तेव्हा पुष्पलता यांनी UPSC ची तयारी करण्याचा निर्णय घेतला.
मूल लहान होतं पण हार मानली नाही
पुष्पलता यांच्यासाठी हा निर्णय अजिबात सोपा नव्हता आणि ध्येय साध्य करणं अवघड होतं, परंतु पतीने आणि सासरच्यांनी त्यांना पूर्णपणे पाठिंबा दिला. लग्नाच्या ४ वर्षांनंतर पुष्पलता यांनी यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसची तयारी सुरू केली. त्या रात्रंदिवस अभ्यास करायच्या. मूल लहान होतं पण हार मानली नाही आणि कठोर परिश्रम करत राहिल्या.
तिसऱ्या प्रयत्नात केली कमाल
पहिल्या दोन प्रयत्नात पुष्पलता यांना यश मिळालं नाही, परंतु तिसऱ्या प्रयत्नात त्यांनी कमाल केली. २०१७ मध्ये पुष्पलता यांनी यूपीएससी सिव्हिल सर्व्हिस परीक्षेत ऑल इंडिया ८० वा रँक मिळवला आणि आयएएस पदावर नियुक्ती झाली. पुष्पलता यांचं यश प्रत्येक महिलेसाठी प्रेरणा आहे ज्यांना असं वाटतं की लग्नानंतर त्यांची स्वप्ने पूर्ण होऊ शकत नाहीत. जर तुमच्याकडे काहीतरी करण्याची जिद्द असेल तर तुम्ही स्वप्न साकार करू शकता.