यूपीएससी परीक्षा ही भारतातील सर्वात कठीण परीक्षांपैकी एक मानली जाते. कठीण स्पर्धा असूनही, दरवर्षी लाखो उमेदवार या परीक्षेसाठी अर्ज करतात, त्यापैकी फक्त काही जणांना यश मिळतं. यूपीएससी २०२४ च्या निकालानंतर कौतुकास्पद गोष्ट समोर आली आहे. दोन बहिणींनी नेत्रदीपक कामगिरी केली आहे. शिक्षकाच्या लेकींनी इतिहास रचला आहे.
उन्नाव जिल्ह्यातील अजयपूर गावातील सौम्या मिश्रा आणि सुमेघा मिश्रा यांनी एकत्रितपणे आयएएस होऊन कुटुंब, गाव आणि जिल्ह्याचं नाव उंचावलं आहे. मोठी बहीण सौम्या मिश्राने तिच्या चौथ्या प्रयत्नात ऑल इंडिया १८ वा रँक मिळवला आहे, तर धाकटी बहीण सुमेघा मिश्राने दुसऱ्या प्रयत्नात २५३ वा रँक मिळवला आहे.
नोकरीसोबत आयएएसची तयारी सुरू
दोन्ही बहिणींचे वडील राघवेंद्र कुमार मिश्रा दिल्लीमध्ये शिक्षक आहेत आणि आई रेणू मिश्रा गृहिणी आहेत. हे कुटुंब गेल्या २७ वर्षांपासून दिल्लीत राहत आहे. सौम्या मिश्रा सध्या मिर्झापूर जिल्ह्यात एसडीएम म्हणून कार्यरत आहे. २०२१ मध्ये पीसीएस परीक्षेत दुसऱ्या प्रयत्नात त्यांनी टॉप टेनमध्ये दुसरं स्थान मिळवलं होतं. नोकरीसोबतच आयएएसची तयारीही सुरू ठेवली आणि चौथ्या प्रयत्नात देशभरात १८ वा रँक मिळवला.
पालकांना दिलं यशाचं श्रेय
सौम्यापेक्षा तीन वर्षांनी लहान असलेल्या सुमेघा मिश्राने आयएएस परीक्षेतही चमकदार कामगिरी केली आहे आणि दुसऱ्या प्रयत्नात २५३ वा रँक मिळवला आहे. सौम्या आणि सुमेघा यांनी त्यांच्या यशाचे श्रेय त्यांच्या पालकांना दिलं आहे. त्यांनी सांगितलं की, त्यांच्या पालकांनी नेहमीच शिक्षणाला प्राधान्य दिलं आणि प्रत्येक पावलावर त्यांना प्रोत्साहन दिलं. कठोर परिश्रम, संयम आणि कुटुंबाच्या पाठिंब्याने कोणतंही स्वप्न पूर्ण करता येतं.