नीट यूजी परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे, ज्यामध्ये अनेक मुलांनी त्यांच्या मेहनतीच्या जोरावर मोठं यश मिळवलं आहे. राजस्थानच्या बालोतरा जिल्ह्यातील बायतु भागात राहणाऱ्या रेखाराम यांच्यासाठी निकालाचा दिवस खूप जास्त खास होता. कारण त्यांचा मुलगा श्रवण कुमारने गरिबीवर मात करून नीट परीक्षेत घवघवीत यश मिळवलं आहे.
हे यश केवळ परीक्षा उत्तीर्ण होण्यापेक्षा खूप जास्त होते. हा गरिबी आणि संघर्षावरचा विजय आहे. एका गरीब शेतकरी कुटुंबातून आलेले रेखारामने लग्नामध्ये लोकांची उष्टी भांडी घासण्याचं काम करतात. त्यांच्या मुलाने झोपडीत राहून स्वप्न पाहिलं. ते स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी तो कष्ट करत आहे. आता लवकरच तो आपलं डॉक्टर होण्याचं स्वप्न पूर्ण करेल.
आर्थिक परिस्थितीमुळे मजूर म्हणून केलं काम
सरकारी शाळेतून दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर कुटुंबाच्या आर्थिक परिस्थितीमुळे श्रवण कुमारला मजूर म्हणून काम करावं लागलं. वडील रेखाराम लग्नात भांडी घासून आणि शेती करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असत. त्यांच्याकडे राहण्यासाठी चांगलं घरही नव्हतं. अशा कठीण परिस्थितीत बारमेरची फिफ्टी व्हिलेजर्स ही संस्था श्रवणच्या मदतीसाठी पुढे आली.
७०० पैकी ५५६ गुण मिळवले
संस्थेने श्रवणला शिक्षणासाठी मदत केली आणि त्याला पुढे जाण्यास प्रोत्साहित केलं. ११वी आणि १२वी सोबतच श्रवणने NEET ची तयारी सुरू केली. त्यानंतर त्याने प्रयत्न केले, पण त्याला यश मिळालं नाही. तरीही तो कठोर परिश्रम करत राहिला आणि आता श्रवणने तिसऱ्या प्रयत्नात NEET UG परीक्षेत यश मिळवलं. श्रवण कुमारने ७०० पैकी ५५६ गुण मिळवले आणि ऑल इंडिया ९७५४ रँक मिळवला.
आता भांडी घासावी लागणार नाहीत
NEET चा निकाल जाहीर झाल्यानंतर, फिफ्टी व्हिलेजर्स इन्स्टिट्यूटचे डॉ. भरत सारण त्यांच्या सहकाऱ्यांसह श्रवण कुमारच्या गावी पोहोचले आणि त्यांनी कुटुंबाला मिठाई भरवून अभिनंदन केलं. जेव्हा कुटुंबाला मुलाच्या यशाची माहिती मिळाली तेव्हा त्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. त्यांच्या डोळ्यात अश्रू होते आणि ते म्हणाले की, आता भांडी घासावी लागणार नाहीत.
मुलाचे वडिलांसाठी कठोर परिश्रम
श्रवणच्या यशाने हे सिद्ध झालं आहे की कठोर परिश्रम, समर्पण आणि योग्य मार्गदर्शनाने कोणीही गरिबीवर मात करू शकतं. डॉ. भरत सारण यांनी श्रवण कुमारच्या आर्थिक परिस्थितीबद्दल सांगितलं की, या गरीब शेतकऱ्याच्या मुलाने वडिलांसाठी कठोर परिश्रमाने हे स्थान मिळवलं आहे. यासाठी संस्थेने श्रवणला पूर्ण पाठिंबा दिला.
श्रवणने पालकांनी दिलं यशाचं श्रेय
श्रवणने त्याच्या यशाचं श्रेय त्याचे पालक, शिक्षक आणि फिफ्टी व्हिलेजर्स संस्थेला दिलं. त्याचे शिक्षक चिमनाराम यांनी त्याला फिफ्टी व्हिलेजर्सबद्दल सांगितलं होतं, ज्यामुळे गरीब विद्यार्थ्यांना मदत होत आहे. फिफ्टी व्हिलेजर्स संस्था बाडमेरमध्ये आहे आणि ती टेस्ट घेऊन आर्थिकदृष्ट्या कमकुवत घटकातील गुणवंत विद्यार्थ्यांची निवड करते आणि त्यांना शिक्षणासाठी मदत करते.