Health Tips : घरचं जेवण आपल्या शरीरासाठी औषधासारखं काम करतं. तेच बाहेरच्या खाण्यामुळे शरीराला सुस्ती आणि आळस येतो. इतकंच नाही तर बाहेरचं काही खाल्ल्यानंतर तहानही जास्त लागते. पुन्हा पुन्हा पाणी पिण्याची इच्छा होते. आपल्यासोबतही अनेकदा असं झालं असेल. पण आपण कधी विचार केलाय का की, असं का होतं? मुळात घरच्या जेवणात आणि बाहेरच्या जेवणात मसाल्यांपासून ते तेलापर्यंत बराच फरक असतो. याच कारणाने बाहेरच्या खाण्यामुळे आरोग्याचं नुकसान होतं. जास्त तहान लागण्याबाबतही तेच कारण आहे. चला पाहुयात बाहेरचं काही खाल्ल्यानंतर तहान जास्त का लागते.
जास्त मीठ आणि मसाले
सामान्यपणे घरी जर आपण चार चपात्या आणि एक वाटी भाजी खाल्ली तर जास्त तहान लागत नाही. पण बाहेर २ जरी चपात्या खाल्ल्या तरी तहान जास्त लागते. यामागचं कारण आहे सोडिअम. घरच्या जेवणाच्या तुलनेत बाहेरच्या जेवणात सोडिअमचं प्रमाण जास्त असतं आणि तेलही जास्त असतं. बाहेरच्या जेवणात प्रोसेस्ड पीठ आणि त्यात टेस्ट वाढवण्यासाठी मिठाचा वापर केला जातो. शरीरात जास्त मीठ झाल्याने फ्लुइड्सचा बॅलन्सही बिघडतो आणि तो ठीक करण्यासाठी शरीर जास्त पाण्याचा वापर करतं. कोशिका मेंदूला संकेत देतात की, आणखी पाण्याची गरज आहे. हेच कारण आहे की, बाहेरचं काही खाल्ल्यानंतर पुन्हा पुन्हा तहान लागते.
जास्त तेलकट आणि जड पदार्थ
बाहेरचं काही खाल्ल्यानंतर जास्त तहान लागण्याचं दुसरं कारण म्हणजे जास्त प्रमाणात खाणे आणि जड पदार्थ खाणे. हलक्या पदार्थांच्या तुलनेत जड पदार्थ पचवण्यासाठी शरीराला जास्त मेहनत करावी लागते. सोबतच आपण जर जास्त तेलकट किंवा प्रोटीनयुक्त आहार घेतला तर या प्रक्रियेतही पोटाला प्रोटीन तोडण्यासाठी जास्त मेहनत करावी लागते. त्यामुळे शरीराला पाणीही जास्त हवं असतं. घरी सुद्धा जेव्हा आपण पु्ऱ्या किंवा भजी खातो, तेव्हाही दिवसभर जास्त तहान लागते आणि पोटही जड वाटू लागतं.
तहान भागवण्यासाठी केवळ पाणी पुरेसं नाही
पुन्हा पुन्हा तहान लागल्यावर केवळ साधं पाणी पुरेसं नाही. तहान शांत करण्यासाठी छास पिणं फार फायदेशीर ठरतं. कारण याने तहान तर भागतेच, सोबतच पचनक्रियाही चांगली होते. जर आपल्यासोबतही असं होत असेल तर छास प्यायला हवं.
