थंडी संपून उन्हाळा सुरू होताना वातावरणात मोठा बदल होतो. सकाळी गारवा, दुपारी उष्णता आणि संध्याकाळी पुन्हा थोडा थंड वारा. अशा बदलांमुळे शरीरावर ताण येतो. या काळात अनेकांना पोटाचे विकार, सर्दी, कफ, घसा खवखवणे, अंगदुखी असे त्रास जाणवतात. त्यामुळे बदलत्या वातावरणात आरोग्याची काळजी घेण्यासाठी काही साध्या पण महत्त्वाच्या सवयी अंगीकारणे गरजेचे आहे. (The season is changing, you should also change 5 things, if you don't want to get sick with cold and cough constantly, do 'this'..)हंगाम बदलताना पोटाचे विकार वाढण्यामागे एक कारण म्हणजे आहारातील अचानक बदल. थंडीत जड, तेलकट आणि मसालेदार पदार्थ खाल्ले जातात. मात्र उन्हाळा सुरू होताच शरीराला हलका, पचायला सोपा आहार आवश्यक असतो. तरीही जर आपण जड, तिखट किंवा रस्त्यावरचे अन्न खाल्ले तर अपचन, आम्लपित्त, जुलाब किंवा पोट फुगणे यांसारख्या समस्या उद्भवू शकतात.
सर्दी-कफ होण्यामागेही हवामानातील बदल कारणीभूत असतो. सकाळ-संध्याकाळ थंडावा आणि दुपारी उष्णता, यामुळे शरीराचे तापमान संतुलन बिघडते. घाम आल्यावर लगेच थंड पाणी पिणे, एसीतून बाहेर पडताच उन्हात जाणे किंवा थंड पेयांचे अति सेवन करणे यामुळे घसा आणि श्वसनमार्ग संवेदनशील होतात. परिणामी सर्दी, खोकला आणि कफ वाढतो.
या समस्यांपासून बचावासाठी काही साध्या सवयी अत्यंत उपयुक्त ठरतात. सर्वप्रथम, आहारात बदल हळूहळू करावा. हलके, पचायला सोपे आणि ताजे अन्न घ्यावे. भाज्या, फळे, ताक, डाळी यांचा समावेश करावा. पाणी पुरेसे प्यावे, पण खूप थंड पाणी टाळावे. उकळून थंड केलेले किंवा कोमट पाणी अधिक फायदेशीर ठरते. दुसरी महत्त्वाची सवय म्हणजे शरीराला तापमानातील बदलाशी जुळवून घेऊ देणे. घाम आला असल्यास लगेच एसीसमोर बसू नये. थंड पेयांचे अतिसेवन टाळावे. सकाळी हलका व्यायाम, प्राणायाम किंवा चालणे यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते. पुरेशी झोप घेणेही तितकेच आवश्यक आहे.
हात स्वच्छ धुणे, बाहेरचे उघड्यावरचे अन्न टाळणे आणि घरात स्वच्छता राखणे यामुळे संसर्गजन्य आजारांपासून बचाव होतो. घसा खवखवत असल्यास कोमट पाण्याने गुळण्या करणे किंवा वाफ घेणे उपयुक्त ठरते. बदलते वातावरण ही नैसर्गिक प्रक्रिया आहे, पण शरीराला त्याची सवय होण्यासाठी थोडी काळजी घ्यावी लागते. योग्य आहार, पुरेसे पाणी, नियमित व्यायाम आणि स्वच्छतेच्या सवयी अंगीकारल्यास थंडी संपून उन्हाळा सुरू होताना होणाऱ्या पोटाच्या आणि सर्दी-कफाच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात टाळता येतात. सामान्य सवयीच मोठे आरोग्य जपतात, हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे.
