सर्दी ही वर्षातील कोणत्याही ऋतूमध्ये होणारी एक सामान्य पण त्रासदायक समस्या आहे. हवामानात बदल झाला की सर्दी लगेच होते. (Monsoon healthcare : cold and heavy head? See effective traditional simple remedies for cold, home remedies )मात्र पावसाळ्यात सर्दी होण्याचे प्रमाण जरा जास्त असते. डोकं जड होणं, नाक वाहणं, घसा खवखवणं, अंग दुखणं असे त्रास सोबत घेऊनच येते. औषधांबरोबरच काही घरगुती उपाय केल्यास सर्दी लवकर बरी होते आणि शरीराला आराम मिळतो.
लक्षात ठेवा की शरीराला पुरेशी विश्रांती देणं आवश्यक असतं. सर्दी म्हणजे काय विशेष नाही असं म्हणून आपण टाळाटाळ करतो आणि मग सर्दी, खोकला, ताप असे आजार वाढतच जातात. सर्दी झाली की शरीर थकतं श्वास घेताना त्रास होत असतो. त्यामुळे झोप आणि विश्रांती घ्यायलाच हवी. तसेच सगळ्यात सोपा आणि प्रभावी मार्ग म्हणजे गरम पाणी. गरम पाणी दिवसातून अनेक वेळा प्यायला पाहिजे. गरम-कोमट पाणी प्यायल्याने घशाला आराम मिळतो आणि शरीरातून विषारी घटक बाहेर टाकले जातात. सर्दी सुटते आणि नाक मोकळे होते.
आलं, तुळस, लिंबू, मध, काळीमिरी अशा पदार्थांचा काढा करून गरम गरम प्यायचा. असा काढा खूप उपयोगी ठरतो. काढ्यामुळे नाक मोकळे होते. घशाची खवखव कमी होते आणि सर्दी लवकर बरी होते.
अगदी उत्तम आणि सोपा उपाय म्हणजे, वाफ घेणं. उकळत्या पाण्यात थोडासा कोबी घालून वाफ घेतली तर आणखी फायद्याचे ठरेल. तसेच रोज दोन वेळा वाफ घेतल्यास बंद नाक उघडेल आणि सर्दीने जड झालेलं डोकं हलकं वाटेल.
लसूण हा सर्दीवर अत्यंत प्रभावी उपाय आहे. लसूण तेलात परतून गरम गरम सूपमध्ये किंवा जेवणात घालून खाल्ल्यास सर्दीवर नियंत्रण मिळतं. लसणाचा वास घ्यायचा तसेच आहारा रोज लसूण असावा.
दुधात हळद घालून छान गरमागरम हळदीचे दूध प्यायचे. हा एक पारंपरिक आणि प्रभावी घरगुती उपाय आहे. हळदीचे रोगप्रतिकारक गुणधर्म शरीराला सर्दीशी लढायला मदत करतात.
सर्दी झाल्यावर लोकं झणझणीत अति तिखट खातात त्याने सर्दी बरी होते असे अनेकांना वाटते. मात्र तसे नसून उलट घसा खरवडला जातो. त्यामुळे अति झणझणीत अन्न खाणं टाळावं. थंड पदार्थ जसे की आइस्क्रीम, कोल्ड ड्रिंक्स यांपासून दूर राहा. या गोष्टी सर्दी वाढवतात आणि बरं होणं अधिक कठीण करतात.
पायांवर उष्णता निर्माण करणं आवश्यक असतं. म्हणून झोपताना गरम पाण्याच्या पिशवीचा वापर किंवा पायांना ऊब मिळेल याची काळजी घ्यावी. पाय चोळावे तसेच हातही चोळावे.
या उपायांनी सर्दी लवकर बरी होते. शरीराची प्रतिकारशक्ती वाढते आणि पुन्हा सर्दी होण्याची शक्यता कमी होते. औषधांवर अवलंबून राहण्याऐवजी अशा घरगुती उपायांनी नैसर्गिक पद्धतीने सर्दीवर मात करता येते. सर्दी फारच जास्त असेल तर मात्र वैद्य गाठणे गरजेचे आहे.