Lukewarm Water Drinking Tips : वजन कमी करायचं असो वा इम्यूनिटी बूस्ट करायची असो किंवा मग पचन तंत्र मजबूत करायचं असो अनेक हेल्थ एक्सपर्ट सकाळी उपाशीपोटी कोमट पाणी पिण्याचा सल्ला देतात. लोकही अनेक फायद्यांचा विचार करून सकाळी न विसरता उपाशीपोटी कोमट पाणी पितात. याचे भरपूर फायदेही मिळतात. पण साधारपणे पाहिलं तर सगळेच हेल्थ एक्सपर्ट सकाळीच उपाशीपोटी एक ग्लास कोमट पाणी पिण्याचा सल्ला देतात. त्यांच्या बोलण्यात जास्तकरून असं आढळत नाही की, दिवसभर कोमट पाणी प्यावं. मग अशात अनेकांना प्रश्न पडतो की, फक्त सकाळीच कोमट पाणी प्यावं का किंवा दिवसभर कोमट पाणी प्यायलं तर काय होईल? हेच आपण समजून घेऊया.
मुळात भारतात सकाळी उपाशीपोटी कोमट पाणी पिण्याची पद्धत फार जुनी आहे. आयुर्वेदात कोमट पिणं एक सोपा आणि प्रभावी उपाय मानला जातो. ज्याने शरीर आतून स्वच्छ तर होतंच, सोबतच वेगवेगळ्या समस्याही दूर होण्यास मदत मिळते.
कोमट पाणी पिण्याचे फायदे?
आयुर्वेदात सांगण्यात आलं आहे की, उपाशीपोटी कोमट पाणी प्याल तर शरीराची जठराग्नि म्हणजे पचनासाठी आवश्यक अग्नि सक्रिय होते. रात्रभर शरीर आराम करत असतं, तेव्हा पचन तंत्र सुस्तीच्या स्थितीत जातं. अशात हलक्या कोमट पाण्याने ते पुन्हा सक्रिय होतं. ज्यामुळे अन्न पचनाची प्रक्रिया योग्य पद्धतीने होते. तसेच गॅस, बद्धकोष्ठता, अपचन अशा समस्याही दूर होतात. इतकंच नाही तर कोमट पाण्याने कफ दोषही संतुलित होते.
अनेक एक्सपर्ट सांगतात की, कोमट पाण्याने आतडीतील अॅक्टिविटी वाढते आणि शरीरात जमा विषारी तत्व बाहेर पडतात. तसेच कुणाला तर छातीत जड वाटत असेल किंवा कफ झाला असेल तर कोमट पाणी खूप गुणकारी ठरतं. कारण याने कफ सैल होतो आणि बाहेर पडतो. वजन कमी करणाऱ्यांसाठी तर कोमट पाणी वरदानच मानलं जातं. कारण याने वजन कमी करण्यासाठी आवश्यक मेटाबॉलिज्म सक्रिय होतं. ज्यामुळे चरबी लवकर बर्न होण्यास मदत मिळते.
दिवसभर कोमट पाणी प्यावं की नाही?
आयुर्वेद सांगतं की, दिवसभर हलकं कोमट पाणी थोड्या थोड्या प्रमाणात पिता पिऊ शकता. जेवणाच्या अर्धा तास आधी थोडं कोमट पाणी प्यायलात तर पचनशक्ती वाढते आणि भूकही कंट्रोल राहते. पण पाणी फार जास्त गरम असू नये. पाणी हलकं कोमटच असावं. सोबतच जास्त प्रमाणात कोमट पाणी प्याल तर अॅसिडिटी किंवा जळजळीचा त्रास होऊ शकतो.
उन्हाळ्यात कोमट पाणी प्यावं की नाही?
दुसरा मुद्दा असा की, प्रत्येक व्यक्तीसाठी आणि प्रत्येक सीझनमध्ये कोमट पाणी समान रूपाने फायदेशीर ठरेलच असं नाही. जास्त तहान लागली असेल किंवा डिहायड्रेशनच्या स्थितीत नॉर्मल किंवा हलकं थंड पाणी उपयोगी ठरतं. कारण जास्त गरम पाण्याने शरीराचं देखील तापमान वाढू शकतं. उन्हाळ्यात जर आधीच शरीराचं तापमान अधिक असेल किंवा पित्त वाढलेलं असेल तर पुन्हा पुन्हा कोमट पाणी पिणं उलटा प्रभाव करू शकतं. अशात जळजळ, अस्वस्थता किंवा अॅसिडिटीची समस्या होऊ शकते.
