ट्रॉमा, एग्झायटी या साऱ्या गोष्टी फक्त नावाला असतात यावर विश्वास ठेवणारे लोक आज २१व्या शतकातही आहेत. या नव्या संकल्पना आहेत , तरुणांची थेरं आहेत असे मानले जाते. मात्र तसे नसून मानसिक त्रास पूर्वीही होतेच फक्त लोकं त्यावर मनसोक्त कधी बोलत नाहीत एवढेच. मात्र आता या विषयांवर बोलण्याची गरज आहे. (Does not communicating on time cause cancer? A depressed mind is an invitation to serious illnesses, listen what experts say)कारण मानसिक त्रासाचे रुपांतर भयंकर आजारांमध्ये होते. बाहेरुन सर्व काही नीट दिसत असलं तरी अनेकांच्या मनावर न बोललेल्या वेदना, दुखापती, आणि आठवणींचा भार असतो. या भावनिक जखमांनाच ट्रॉमा असं म्हणतात. आणि जेव्हा त्या जखमा पूर्णपणे भरत नाहीत, विसरल्या जात नाहीत किंवा त्यावर योग्य उपचार होत नाहीत, तेव्हा त्यांना अनहिल्ड ट्रॉमा म्हणतात.
ट्रॉमा म्हणजे एखाद्या व्यक्तीने अनुभवलेला तीव्र मानसिक धक्का — जसे की अपघात, प्रिय व्यक्तीचा मृत्यू, अत्याचार, नाती तुटणे, बालपणातील कठीण अनुभव इत्यादी. अगदी साधी गोष्टही असू शकते. काही वेळा आपण ते प्रसंग विसरल्यासारखे दाखवतो, पण ते मनात कायम राहतात. या न भरलेल्या भावनिक जखमा हळूहळू मनावर आणि शरीरावरही परिणाम करु लागतात. थकवा, निद्रानाश, चिडचिड, नकारात्मक विचार किंवा शारीरिक आजार यांचे मूळ कधी कधी या दडलेल्या ट्रॉमामध्ये असते.
प्रसिद्ध डॉ. तरण कृष्णा यांनी अलीकडेच राज शमानी यांच्यासोबतच्या पॉडकास्टमध्ये सांगितले की “अनहिल्ड ट्रॉमा हे शरीरातील गंभीर आजारांचे, विशेषतः कॅन्सरसारख्या रोगांचे एक संभाव्य कारण असू शकते.” त्यांच्या मते, शरीर आणि मन यांचा संबंध अतिशय खोल आहे. जेव्हा मनातील ताण, राग किंवा वेदना सतत दडपून ठेवला जातो, तेव्हा शरीराच्या प्रतिकारशक्तीवर परिणाम होतो. हे असंतुलन काही वेळा आजाराच्या रुपात प्रकट होते. त्यांनी हेही सांगितले की, आपल्या भावना ओळखून त्यांना मोकळं करणे, संवाद साधणे हे आरोग्य टिकवण्यासाठी तितकेच आवश्यक आहे जितके योग्य आहार आणि व्यायाम.
डॉ. म्हणतात, तुम्ही कितीही डाएट करा, व्यायाम करा पण मानसिक आरोग्य जपावेच लागते. आदर्श दिनचर्या असली तरी मनात दडलेल्या गोष्टी, ट्रॉमा, एग्झायटी शेवटी शरीरावर परिणाम करतेच. कॅन्सरसारखे भयंकर आजार या ट्रॉमामुळे होतात. त्यामुळे वेळीच मानसिक शांतता जपायला शिका. त्यासाठी संवाद साधा, तज्ज्ञांची मदत घ्या. उपचार करा.
