भारताचा स्फोटक सलामीवीर अभिषेक शर्माची प्रकृती अचानक बिघडल्याने त्याला १० फेब्रुवारीच्या रात्री रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पोटातील गंभीर इन्फेक्शनमुळे त्याच्यावर उपचार सुरू होते. यामध्ये त्याचं वजन कमी झालं. आता अभिषेकने स्वतःच्या प्रकृतीबद्दल माहिती देताना सांगितलं की, तो सध्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली असून उपचारांना प्रतिसाद देत आहे. पोटाला आराम मिळावा म्हणून तो सध्या अतिशय साधा आहार घेत आहे. त्याच्या जेवणात प्रामुख्याने 'डाळ-भात' यांसारख्या हलक्या पदार्थांचा समावेश आहे. अभिषेकला नेमकं काय झालं होतं याबद्दल जाणून घेऊया...
झायनोव्हा शाल्बी हॉस्पिटलचे गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट डॉ. ऋषिकेश मालोकर यांनी आजारपणातील 'वेट लॉस' संदर्भात काही महत्त्वाचे खुलासे केले आहेत. डॉ. ऋषिकेश मालोकर यांच्या मते पोटातील इन्फेक्शनदरम्यान होणारी वजनातील घट ही प्रामुख्याने 'वॉटर लॉस' असते. उलट्या, जुलाब, घाम येणं किंवा ताप यामुळे शरीरातील द्रव पदार्थ मोठ्या प्रमाणात बाहेर टाकले जातात. डिहायड्रेशन होतं. शरीरातील पाण्याचं प्रमाण कमी झाल्याने वजन कमी होतं, परंतु हे फॅट लॉस नाही.
डिहायड्रेशनमुळे होणारी ही वजनातील घट आरोग्यासाठी घातक ठरू शकते. त्यामुळे आजारपणात जास्तीत जास्त द्रव पदार्थांचे सेवन करणं आणि शरीरातील पाण्याची पातळी टिकवून ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. पोटाच्या इन्फेक्शनमुळे खेळाडूंना फिटनेस राखण्यात अडचणी येतात, मात्र योग्य विश्रांती आणि आहारामुळे अभिषेक लवकरच मैदानात पुनरागमन करेल अशी चाहत्यांना आशा आहे.
अभिषेकला काय झालं?
खूप ताप - पोटातील इन्फेक्शनमुळे त्याला सतत खूप ताप येत होता.
पोटदुखी - पोटातील वेदना वाढल्यामुळे त्याला तातडीने डॉक्टरांच्या सल्ल्याने रुग्णालयात दाखल व्हावं लागलं.
वजन घटलं - या आजारपणामुळे त्याचे काही किलो वजनही कमी झाले आहे.
आजारपणात वजन का घटतं?
जेव्हा आपले शरीर एखाद्या इन्फेक्शनशी लढत असतं, तेव्हा शरीरात अनेक बदल घडतात
कॅलरी बर्न - इन्फेक्शनशी लढण्यासाठी शरीराला जास्त ऊर्जेची गरज असते, ज्यामुळे अधिक कॅलरीज बर्न होतात.
भूक न लागणं - आजारपणात जेवण्याची इच्छा उडते, भूक लागत नाही. ज्यामुळे अन्नाद्वारे मिळणारी ऊर्जा कमी होते.
उलट्या - पोटातील इन्फेक्शनमुळे सतत उलट्या किंवा जुलाब होतात.
मेटाबॉलिजम वाढतं - शरीराचा मेटाबॉलिजम रेट वाढतो, परिणामी ऊर्जा वेगाने वापरली जाते.
वजन घटणं - खाण्याचं प्रमाण कमी आणि उर्जेचा वापर जास्त झाल्यामुळे वजनात घट दिसून येते.
रिकव्हरीसाठी वेळ का लागतो?
पोटाच्या संसर्गानंतर शरीरात काही बदल जाणवतात, जे पूर्णपणे बरे होण्यासाठी वेळ घेतात.
ऊर्जेची पातळी कमी होणं - इन्फेक्शनमुळे शरीरातील पोषक तत्व बाहेर पडतात, ज्यामुळे प्रचंड थकवा जाणवतो.
स्नायूंची ताकद कमी होणं - अशक्तपणामुळे स्नायूंमधील ऊर्जा कमी होते, ताकद कमी होते.
संवेदनशील पचनसंस्था - इन्फेक्शन गेल्यानंतरही तुमची पचनसंस्था काही काळ कमकुवत असते, त्यामुळे जड अन्न पचवणं कठीण जातं.
काय काळजी घ्यावी?
तज्ज्ञांच्या मते, पोटातील इन्फेक्शननंतर काही दिवस विशेष पथ्य पाळणं आवश्यक आहे:
हलका आहार - सुरुवातीला पचायला हलका आहार घ्यावा. उदा. वरण-भात, मुगाची खिचडी किंवा पेज.
हायड्रेशन (पाणी पिणं) - शरीरातील पाण्याची पातळी टिकवून ठेवण्यासाठी भरपूर पाणी, ओआरएस (ORS) किंवा नारळ पाणी प्यावं.
हळूहळू सामान्य आहार - इन्फेक्शन बरं होताच लगेच तेलकट किंवा तिखट पदार्थ खाऊ नका. हळूहळू तुमच्या रोजच्या जेवणाकडे वळा.
पोटातील इन्फेक्शनमुळे अनेकांचं वजन घटतं. मात्र घाबरून जाण्याच काहीच कारण नाही. एकदा शरीराची पूर्ण रिकव्हरी झाली की वजन पुन्हा पूर्ववत होतं.
