कोरोना व्हायरसचा देशात पुन्हा एकदा वेगाने प्रसार होत आहे. भारतात कोरोनाच्या एक्टिव्ह रुग्णांची संख्या आता ४३०० पेक्षा जास्त झाली आहे. तर १९ मे पर्यंत कोरोनाच्या एक्टिव्ह रुग्णांची संख्या फक्त २५७ होती. ज्या लोकांनी लस घेतली आहे त्यांना कोरोनाला घाबरण्याची गरज नाही का? असा प्रश्न आता लोकांना पडला आहे. डॉ. संदीप नायर यांनी एनडीटीव्हीशी संवाद साधताना या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे.
डॉक्टर संदीप नायर म्हणाले की, लस घेतल्यानंतर तुम्हाला कोरोना व्हायरस होणार नाही असं नाही, परंतु ते कोरोनाच्या गंभीर स्वरूपापासून तुमचं निश्चितच संरक्षण करेल. लस घेतल्याचा अर्थ असा नाही की, तुम्ही कोरोनापासून बचाव करण्यासाठी खबरदारी घेणं थांबवा. ज्याप्रमाणे हेल्मेट घातल्यानंतरही आपण आरामात बाईक चालवतो, स्टंट करायला सुरुवात करत नाही. त्याचप्रमाणे, लस घेतल्यानंतरही खबरदारी घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे.
कोरोना प्रोटोकॉलचे पालन करण्यासाठी आपण नेहमी लक्षात ठेवल्या पाहिजेत अशा तीन महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे - हात स्वच्छ ठेवणं, सोशल डिस्टेंसिंग फॉलो करणं आणि मास्क घालणं. आपण या तीन गोष्टी विसरू नयेत आणि चौथी गोष्ट म्हणजे लसीकरण. याद्वारे आपण कोरोनावर बऱ्याच प्रमाणात नियंत्रण मिळवलं आहे. डॉ. नायर म्हणाले, की जेव्हा तुम्ही एक लस घेता आणि नंतर दुसरी घेता तेव्हा एक लेव्हल तयार होते, नंतर ती कमी होताच, तिसरी लस दिली जाते जेणेकरून ती पातळी कायम राहते. त्यावेळी लसीकरण सर्वत्र उपलब्ध होतं.
भारतात कोरोनाचा एक नवीन व्हेरिएंट देखील समोर आला असून XFG असं त्याचं नाव आहे. हा नवीन व्हेरिएंट माणसांच्या सर्वात मजबूत रोगप्रतिकारक शक्तीलाही चकवा देण्यास सक्षम आहे. XFG व्हेरिएंटमध्ये एकूण चार म्यूटेशन आहेत. म्हणूनच तो इतर व्हेरिएंटपेक्षा वेगाने पसरत आहे. असं सांगितलं जात आहे की या कोरोना व्हेरिएंटचा पहिला रुग्ण कॅनडामध्ये सापडला होता, परंतु त्याचा संसर्ग इतर देशांमध्ये पसरला आहे आणि आता भारतातही आहे. डॉक्टरांनी मात्र हा नवीन व्हेरिएंट फारसा चिंताजनक नाही, गंभीर लक्षणं दिसत नाहीत असं म्हटलं आहे.