डोक्यावर ऊन तापायला लागलं की आपल्याला गारेगार काहीतरी खायची इच्छा होते. सतत पाण्याने ही तहान भागत नाही इतकेच नाही तर शीतपेय, बर्फ, आइस्क्रीम या गोष्टी आरोग्याला म्हणाव्या तितक्या चांगल्या नसतात. अशावेळी आपल्याला दिलासा देणारी गोष्ट असते ती म्हणजे उन्हाळ्यात बाजारात येणारी फळे. ठराविक ऋतूमध्ये बाजारात मिळणारी फळे आवर्जून खायला हवीत असे डॉक्टर आणि आहारतज्ज्ञ नेहमी सांगतात, त्यामागे कारणही तेच आहे. विशिष्ट ऋतूमध्ये मिळणारी फळे ही त्या ऋतुमध्ये खाणे फायदेशीर असते. आंबा या फळांच्या राजाची आपण उन्हाळ्यात आतुरतेने वाट पाहत असतो. त्याचबरोबर या काळात मिळणारी आणि आपली तहान शमवणारी फळे म्हणजे कलिंगड आणि खरबूज. लालबुंद गारेगार कलिंगडाच्या फोडी म्हणजे उन्हाळ्याच्या भर दुपारी शरीराला आणि मनाला शांत करणारी गोष्ट. बाहेर कडक ऊन असताना रवाळ आणि गोड कलिंगड खाल्ले की आपल्यालाही तृप्त झाल्यासारखे वाटते. मनाची आणि शरीराची तहान शमवणारे हे फळ आरोग्यासाठी कसे फायदेशीर (Benefits of Watermelon) असते पाहूया...
१. कलिंगड हे पाणीदार फळ असल्याने उन्हाळ्याच्या दिवसांत होणारे डिहायड्रेशन कमी करण्याचे काम या फळामुळे होते. चवीला गोड असलेले कलिंगड खाऊन उन्हामुळे आलेली मरगळ निघून जाण्यास मदत होते. त्यामुळे कार्यक्षमतेत वाढ होण्यास मदत होते.
२. कलिंगडमध्ये अँटिऑक्सिडेंट्स, जीवनसत्त्वे बी, सी आणि डी मोठ्या प्रमाणात आढळतात. उन्हाळ्यात शरीराची लाहीलाही होत असल्याने पुरेसे अन्न खाल्ले जात नाही. सतत पाणी, सरबत, ज्यूस या गोष्टी घ्याव्याशा वाटतात. अशात कलिंगड खाल्ल्यास शरीराला आवश्यक असणारी जीवनसत्त्वे मिळण्याचे काम कलिंगडाच्यामार्फत होते. त्यामुळे शरीराचे पोषण करण्याचे काम कलिंगड करते.
३. कलिंगड खाल्ल्याने गॅसेस, बद्धकोष्ठता या तक्रारी दूर होण्यास मदत होते. हल्ली जीवनशैलीतील बदलामुळे पचनाशी निगडीत तक्रारींचे प्रमाण वाढले आहे. मात्र कलिंगडामुळे या तक्रारी दूर होतात. असे असले तरी आवडते म्हणून किंवा उन्हाचा त्रास होतो म्हणून प्रमाणापेक्षा जास्त कलिंगड खाल्ल्यास पोट खराब होण्याचीही शक्यता असते.
४. कडक उन्हात फिरल्याने अनेकांना ग्लानी येणे किंवा डोळ्यासमोर अंधारी येणे असे त्रास होतात. अशावेळी कलिंगड खाल्लेले असल्यास या त्रासांचे प्रमाण कमी होऊ शकते. त्यामुळे घरातून बाहेर पडताना कलिंगड खाल्लेले चांगले. पण कडक उन्हातून आल्या आल्या कलिंगड खाऊ नये. त्यामुळे त्रास होऊ शकतो.
५. कलिंगड हे नाश्ता झाल्यावर, दुपारच्या वेळी किंवा संध्याकाळीही शरीराची लाहीलाही होत असताना खावे. सकाळी उठल्यावर उपाशी पोटी कलिंगड खाल्ल्यास त्याचाही शरीराला त्रास होऊ शकतो. कलिंगडामुळे रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होते. तसेच कोलेस्टेरॉल नियंत्रणात राहण्यासाठी आणि हृदयाचे कार्य सुरळीत चालण्यासाठीही कलिंगड खाणे अतिशय फायदेशीर असते.