घरी आपण बऱ्याचदा पुरी किंवा भजी तळल्यानंतर कढईमध्ये उरलेलं तेल पुन्हा वापरतो. पण हे असं करणं खूप हानिकारक आहे. उरलेलं तेल वारंवार वापरणं योग्य नाही असं आरोग्य तज्ज्ञांचं म्हणणं आहे. असं केल्याने आरोग्यावर खूप वाईट परिणाम होतो. बरेचदा लोक उरलेले तेल फेकून देण्याऐवजी ते वापरतात. पण तुमचा हा छोटासा निष्काळजीपणा धोकादायक रूप घेऊ शकतो.
अभ्यासानुसार, स्वयंपाकासाठी वापरलेलं तेल पुन्हा गरम केल्याने विषारी पदार्थ बाहेर पडतात आणि शरीरात फ्री रॅडिकल्स देखील वाढतात, ज्यामुळे जळजळ आणि क्रोनिक आजार होतात. फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स ऑर्ट ऑफ इंडिया ( FSSAI) मार्गदर्शक तत्त्वांनुसार, तेल पुन्हा गरम करणं टाळलं पाहिजे आणि जर तुम्हाला तेल पुन्हा वापरायचं असेल तर ट्रान्स-फॅट तयार होऊ नये म्हणून तुम्ही ते जास्तीत जास्त तीन वेळा वापरू शकता.
उच्च तापमानाला गरम केलेलं तेल विषारी धूर सोडतं. प्रत्येक वेळी तेल गरम केलं जातं तेव्हा त्यातील रेणू थोडेसे तुटतात. यामुळे ते त्याच्या धुराच्या बिंदूपर्यंत पोहोचू शकतात आणि प्रत्येक वेळी वापरताना त्याचा जास्त वास येऊ लागतो. जेव्हा असं होतं, तेव्हा हानिकारक पदार्थ हवेत आणि शिजवलेल्या अन्नात रिलीज होतात.
कोलेस्ट्रॉल लेव्हल वाढते
उच्च तापमानात, तेलात असलेले काही फॅट्स, ट्रान्स फॅट्समध्ये बदलतात. ट्रान्स फॅट्स हे हानिकारक फॅट्स आहेत जे हृदयरोगाचा धोका वाढवतात. जेव्हा तेलाचा पुन्हा वापर केला जातो तेव्हा ट्रान्स फॅटचं प्रमाण आणखी वाढतं.
ब्लड प्रेशर वाढतं
अन्नपदार्थांमध्ये असलेला ओलावा, वातावरणातील ऑक्सिजन, उच्च तापमान यामुळे हायड्रोलिसिस, ऑक्सिडेशन आणि पॉलिमरायझेशन सारख्या प्रतिक्रिया निर्माण होतात, या प्रतिक्रिया वापरल्या जाणाऱ्या तळण्याच्या तेलाची रासायनिक रचना बदलतात आणि त्यात बदल करतात. मोनोग्लिसराइड्स, डायग्लिसराइड्स आणि ट्रायग्लिसराइड्स तयार करणारे मुक्त फॅटी अॅसिड्स आणि रॅडिकल्स सोडतात. यामुळे ब्लड प्रेशर वाढतं