आपल्यापैकी बहुतेक जण एकाच वेळी भाज्या खरेदी करतात, जेणेकरून पुन्हा पुन्हा बाजारात जाण्याची गरज भासणार नाही. घरी आणलेल्या या भाज्या फ्रेश राहण्यासाठी फ्रिजमध्ये ठेवतात. फ्रिजमध्ये ठेवलेल्या भाज्या लवकर खराब होत नाहीत आणि जास्त काळ ताज्या राहतात. पण तुम्हाला माहिती आहे का की काही भाज्या फ्रिजमध्ये ठेवून नंतर खाल्ल्याने आरोग्यावर खूप वाईट परिणाम होऊ शकतो.
न्यूट्रिशनिस्ट किरण कुकरेजा यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम हँडलवर या प्रकरणाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. काही भाज्या अशा आहेत, ज्या फ्रीजमध्ये ठेवल्यास त्यांची चव खराब होते आणि त्यातील पोषक घटक कमी होतात, पण त्या खाल्ल्याने आरोग्याचंही गंभीर नुकसान होऊ शकते. कॅन्सरचा धोका देखील वाढू शकतो असं म्हटलं आहे.
लसूण
न्यूट्रिशनिस्टने दिलेल्या माहितीनुसार, लसूण फ्रिजमध्ये ठेवू नये. कारण त्याची चवही खराब होते आणि त्याचे औषधी गुणधर्म कमी होतात. कधीही सोललेली लसूण खरेदी करू नका आणि ती फ्रीजमध्येही ठेवू नका. असं केल्याने, लसूणला लवकर बुरशी लागू शकते, ज्यामुळे कॅन्सर देखील होऊ शकतो.
कांदे
कांदे फ्रिजमध्ये ठेवल्याने त्यातील स्टार्च साखरेत बदलतात, ज्यामुळे कांदे जास्त गोड होतात आणि लवकर कुजू लागतात. अर्धा कापलेला कांदा फ्रीजमध्ये ठेवू नका असा सल्ला देण्यात आला आहे. कापलेला असल्यास कांदा वातावरणातील बॅक्टेरिया शोषून घेऊ लागतो, जो खाल्ल्यामुळे नुकसान होऊ शकतं.
बटाटे
बटाटे फ्रीजमध्ये ठेवू नका. बटाट्यांना थंड तापमानात (८ अंश सेल्सिअसपेक्षा कमी) ठेवल्यास, त्यात असलेले स्टार्च साखरेत बदलतात. जेव्हा असे बटाटे तळले जातात किंवा बेक केले जातात तेव्हा ते एक्रिलामाइड नावाचा हानिकारक पदार्थ बाहेर सोडतात, ज्यामुळे कॅन्सरचा धोका देखील वाढू शकतो.