डाळ बटाट्याचे कालवण हा महाराष्ट्रातील अनेक घरांमध्ये केला जाणारा अगदी पारंपरिक आणि जिव्हाळ्याचा पदार्थ आहे. साधी डाळ आणि बटाटा यांसारख्या रोजच्या वापरातील साहित्यापासून तयार होणारा हा पदार्थ चवीला मस्त हलका, घरगुती आणि समाधान देणारा असतो. पूर्वीच्या काळी ग्रामीण भागात कमी खर्चात पौष्टिक आणि पोटभर जेवण म्हणून या कालवणाला विशेष महत्त्व होते. या पदार्थाची खासियत म्हणजे त्यातील साधेपणा. (Make traditional dal batata kalvan - no extra spices, no extra effort, yet a satisfying meal)डाळीचा मऊसर पोत आणि बटाट्याची सौम्य चव एकत्र येऊन एक वेगळीच लज्जत तयार होते. फार जड मसाले किंवा तिखटपणा नसतानाही हे कालवण चविष्ट लागते. त्यामुळे लहान मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वांना हा पदार्थ सहज आवडतो. पाहा डाळ बटाटा कालवण करण्याची सोपी पद्धत.
साहित्य
तेल, जिरे, कडीपत्ता, कांदा, टोमॅटो, मीठ, हळद, गरम मसाला, कांदा लसूण मसाला, बटाटा, चणाडाळ, पाणी, शेंगदाण्याचे कुट
कृती
१. बटाटे स्वच्छ धुवायचे, त्याचे तुकडे करायचे. सालं काढायची गरज नाही. त्यासकटच करा फक्त स्वच्छ धुवा. टोमॅटोचे तुकडे करायचे. कांदा सोलायचा आणि छान बारीक चिरायचा. चणाडाळ तासभरासाठी भिजवायची.
२. एका कुकरमध्ये थोडे तेल घ्यायचे. तेल छान गरम झाल्यावर त्यात जिरे घालायचे. जिरे फुलल्यावर त्यात कडीपत्ता घालायचा आणि कडीपत्ता छान परतून घ्यायचा. नंतर बारीक चिरलेला कांदा घालायचा. कांदा गुलाबी परतायचा. कांदा छान खमंग परतल्यावर त्यात टोमॅटो घालायचा. टोमॅटोला पाणी सुटायला लागेल.
३. मग त्यात चमचाभर हळद घाला. तसेच कांदा लसूण मसाला घालायचा. गरम मसालाही घालायचा आणि फोडणी एकजीव करायची. त्यात मीठ घालायचे. छान मिक्स करायचे. त्यात बटाटा घालायचा, परतायचा. भिजलेली चणाडाळ घालायची. चणाडाळ जरा परता आणि नंतर त्यात शेंगदाण्याचे कुट घाला. ढवळून घ्या आणि पाणी ओता. पाण्याला जरा उकळी आली की कुकर लावा. शिट्या काढून घ्या.
४. गरमागरम कालवण भाकरीसोबत एक नंबर लागेल. भातासोबतही मस्त लागते आणि चपातीसोबतही. सोबत कांदा आणि मिरची घेतली तर स्वाद नक्कीच वाढेल.
