आंबोळी हा कोकणातील एक पारंपरिक आणि अतिशय हलका, पचायला सोपा पदार्थ आहे. नाश्त्यासाठी घरोघरी केलीच जाते आणि आवडीने खाल्ली जाते. (Make hot traditional breakfast -make perfect Amboli just do this 1 thing while soaking the flour)योग्य प्रमाणात साहित्य आणि नीट केलेली प्रक्रिया यामुळे आंबोळी मऊ, जाळीदार आणि चविष्ट बनते. सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा हलक्या जेवणासाठी आंबोळी उत्तम पर्याय ठरतो.
परफेक्ट आंबोळी करण्यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे तांदूळ आणि उडीद डाळ यांचं योग्य प्रमाण. साधारणपणे २ कप तांदूळ आणि अर्धा कप उडीद डाळ हे प्रमाण योग्य मानलं जातं. काही जण त्यात थोडे मेथीदाणे घालतात, ज्यामुळे आंबोळी अधिक मऊ होते आणि छान फुलते. तांदूळ आणि डाळ वेगवेगळे स्वच्छ धुऊन किमान ५-६ तास भिजत ठेवावेत.
भिजवलेले तांदूळ आणि डाळ एकत्र करून बारीक वाटून घ्यावेत. पीठ फार घट्ट किंवा फार पातळ नसावं, मध्यमसर असावं. वाटलेलं पीठ एका भांड्यात काढून त्यात चवीनुसार मीठ घालावं आणि ते किमान ७-८ तास आंबण्यासाठी ठेवावं. हवामानानुसार ही वेळ थोडी कमी-जास्त होऊ शकते. पीठ छान फुगलं आणि त्यात छोटे बुडबुडे दिसू लागले की आंबोळी बनवण्यासाठी ते तयार झालं आहे.
आता तवा गरम करून त्यावर हलकंसं तेल लावावं. तवा जास्त तापलेला नसावा, नाहीतर आंबोळी व्यवस्थित पसरत नाही. एक डावभर पीठ तव्यावर ओतून ते स्वतःहून पसरू द्यावं, मग चमच्याने जरासं पसरवा. डोशासारखं पसरवू नका. जाडसरच ठेवा. झाकण ठेवून मध्यम आचेवर शिजू द्यावं. वरच्या बाजूला छान जाळीदार पोत दिसू लागला आणि खालची बाजू हलकी सोनेरी झाली की आंबोळी तयार होते. काही जणं एकाच बाजूने परततात. दोन्ही बाजूनही परतू शकता. गरमागरम आंबोळी नारळाची चटणी, हिरवी चटणी किंवा गुळ-तूपासोबत खायला खूपच स्वादिष्ट लागते. योग्य प्रमाण, चांगलं आंबवलेलं पीठ आणि योग्य तापमानावर परतलेली आंबोळी खऱ्या अर्थाने परफेक्ट होते.
