भाजीपाला कायम साफ करुन मगच वापरावा हे जरी आपल्याला माहिती असले तरी टाळाटाळ अनेक जण करतात. काही भाज्या अशा असतात ज्या व्यवस्थित धुणे फार गरजेचे असते. जसे की फ्लावर, पालक, भेंडी यांसारख्या भाज्यांमध्ये अळ्या, माती, धूळ आणि कीटक जास्त आढळतात. (Larvae are hidden in 'these' vegetables, they enter the stomach without being noticed - the correct way to clean vegetables)या भाज्या बाहेरुन नीट दिसल्या तरी त्यांच्या सूक्ष्म फटींमध्ये अळ्या लपलेल्या असतात. म्हणून अशा भाज्या वापरण्यापूर्वी त्यांची स्वच्छता करणे अत्यंत महत्त्वाचे असते. या स्वच्छतेमुळे केवळ अळ्या निघून जात नाहीत, तर रासायनिक फवारणीमुळे खराब झालेल्या भाज्या स्वच्छही होतात. या भाज्या नीट साफ केल्यावर आपले आरोग्य सुरक्षित राहते.
फुलकोबी किंवा फ्लावर धुताना प्रथम त्याचे छोटे तुकडे करा. मग कोमट पाण्यात मीठ आणि थोडी हळद टाकून २० मिनिटे भिजत ठेवा. हळद आणि मीठ हे नैसर्गिक जंतूनाशक असल्यामुळे अळ्या आणि कीटक सहजपणे बाहेर पडतात. नंतर ते तुकडे स्वच्छ पाण्याने दोन-तीन वेळा धुवा. त्याचप्रमाणे ब्रोकोली आणि इतरही फुलभाज्यांमध्ये अळ्या जास्त प्रमाणात असतात, त्यामुळे त्यांनाही अशाच पद्धतीने स्वच्छ करणे योग्य ठरते.
पालक, मेथी, चौलाई, शेवग्याची पाने, कोथिंबीर आणि पुदिना अशा भाज्या वापरण्यापूर्वी पाने एकेक करून वेगळी करा. भाजी निवडून घ्या. ती पाण्याने भरलेल्या मोठ्या भांड्यात बुडवून ठेवा. काही वेळात माती आणि धूळ खाली बसते. हे पाणी ओतून टाका आणि पुन्हा स्वच्छ पाण्याने धुवा. शेवटी थोडे मीठाचे पाणी घेऊन त्यात पाने १० मिनिटे ठेवली तर कीटक आणि अळ्या पूर्णपणे निघून जातात.
भेंडी, वांगी, फरसबी, मिरची आणि भोपळ्यासारख्या भाज्यांमध्ये अळ्या कमी असल्या तरी त्यांच्यावर रासायनिक फवारणी केलेली असतेच. त्यामुळे त्या भाज्या वाहत्या पाण्याखाली नीट धुऊन मग कपड्याने पुसून घ्याव्यात. भेंडी धुतल्यानंतर लगेच कापू नये, थोडा वेळ वाळू द्यावी म्हणजे तिचा चिकटपणा कमी होतो. भेंडी ओल्या फडक्याने पुसावी. पाण्यात बुडवू नये.
अळ्यांचे प्रमाण विशेषतः फुलकोबी, ब्रॉकली, पालक, कोथिंबीर, पुदिना, मेथी, चौलाई आणि शेवग्याच्या पानांत आढळते. म्हणून या भाज्या घेतल्यानंतर त्यांची नीट तपासणी करून मगच शिजवाव्यात. भाज्या स्वच्छ करताना गरम पाणी, मीठ, हळद किंवा व्हिनेगरचा वापर नेहमीच उपयुक्त ठरतो. असे केल्याने भाज्या स्वच्छ, सुरक्षित आणि पोषक राहतात, तसेच घरातील अन्नही निरोगी आणि स्वादिष्ट होते.