Jaggery In Summer : गुळाचा गोडवा अनेकांना आवडतो. गूळ गोडव्याचा एक नैसर्गिक सोर्स आहे. त्यामुळे गूळ हा नेहमीच आपल्या आरोग्यासाठी एकप्रकारे वरदानच मानला जातो. भारतीय किचनमध्ये गुळाचा वापर वेगवेगळ्या पदार्थांमध्ये केला जातो. साखरेऐवजी गुळाचा चहा भरपूर लोक आवडीने पितात. पण उन्हाळा येताच अनेकांना प्रश्न पडतो की, या दिवसांमध्ये गूळ खाणं चांगलं की नुकसानकारक? तेच पाहूयात.
गुळाचे फायदे
गूळ केवळ चहा किंवा पदार्थांना गोडवा देतो असं नाही तर यात भरपूर पोषक तत्वेही असतात. योग्य प्रमाणात जर गूळ खाल्ला तर यापासून शरीराला कितीतरी फायदे मिळतात. गुळामध्ये आयर्न, कॅल्शिअम, मॅग्नेशिअम आणि शरीरासाठी आवश्यक अनेक मिनरल्स भरपूर असतात. गुळाने शरीराला लगेच एन्रजी मिळते आणि आपलं पचन तंत्रही याने दुरूस्त राहतं. इतकंच नाही तर गुळाने रक्त साफ होतं आणि शरीरातील विषारी तत्व बाहेर पडतात.
उन्हाळ्यात घ्यावी लागते काळजी
गूळ तब्येतीसाठी तसा खूप फायदेशीर असतो. पण उन्हाळ्यात जर गूळ जास्त प्रमाणात खाल्ला तर वेगवेगळ्या समस्यांचा धोका वाढतो. जास्त प्रमाणात गूळ खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते. ज्या लोकांना नेहमीच अॅसिडिटीची तक्रार असते, नाकातून रक्त येतं किंवा ज्यांना आधीच जास्त गरमी लागते, त्यांनी या दिवसांमध्ये रोज जास्त गूळ खाणं टाळावं.
उन्हाळ्यात गूळ खाण्याची योग्य पद्धत
जर आपण नेहमीच गूळ खात अशाल आणि उन्हाळ्यातही यापासून फायदे मिळवायचे असतील तर काही सोप्या टिप्स फॉलो कराव्या. या दिवसांमध्ये पूर्ण दिवसभरात थोड्या प्रमाणात म्हणजे ५ ते १० ग्रॅम इतकाच गूळ खावा. उन्हाळ्यात गूळ खाण्याची योग्य वेळ सकाळी आणि सायंकाळची मानली जाते. गुळातील उष्णता संतुलित करण्यासाठी तो नेहमी थंड असलेल्या गोष्टी, जसे की, पाणी, ताक किंवा बडीशेपसोबत घेणं अधिक चांगलं. एकंदर काय तर उन्हाळ्यात गूळ खाणं थेटपणे नुकसानकारक नाही. फक्त काळजी घ्यावी लागेल की, तो जास्त प्रमाणात खाऊ नये.