सकाळची सुरुवात असो किंवा संध्याकाळचा थकवा, एक कप गरमागरम चहा मिळाला की जणू शरीरात नवीन ऊर्जा येते आणि फ्रेशनेस वाढतो. आपल्यापैकी काहीजण असे असतात की, ज्यांच्या दिवसाची सुरुवात ही चहानेच होते. दिवसभरात आपण अनेक कप चहा पितो. चहा प्यायचा म्हटलं की आपल्याला सगळ्यात आधी चहाची टपरीच आठवते. टपरीवर मिळणाऱ्या चहाची चव काही औरच असते. गडद रंग, मस्त उकळ, सुगंधी वेलची-आलं आणि वरून येणारी ती खास फेसाळ चव… घरी कितीही वेळा चहा केला तरी तो टपरीसारखा लागत नाही, असं अनेकांना वाटतं. आपण घरी कितीही उत्तम दर्जाची चहा पावडर किंवा फुल्ल क्रीम दूध वापरलं, तरी रस्त्याच्या कडेला मिळणाऱ्या त्या 'टपरीवरच्या चहाची' सर कशालाच येत नाही. चहाचा तो गडद रंग, मलईदार दाटपणा आणि आल्या-वेलचीचा तो दरवळणारा सुगंध... हे सगळं घरी का जमत नाही? असा प्रश्न अनेकांना पडतो. पण खरं सांगायचं तर, चहाची चव तो तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पदार्थांपेक्षा पद्धतीवर जास्त अवलंबून असते. काही सोप्या ट्रिक्स आणि योग्य टाइमिंग जमलं, तर घरच्याघरीच अगदी टपरीवर मिळतो तसाच मस्त कडक चहा तयार करता येतो. फक्त काही छोटे बदल केले तर चहा अगदी परफेक्ट टपरी सारखाच होईल..(How to make tapri style chai at home).
अनेकांना वाटतं की टपरीवर खूप दूध वापरलं जातं म्हणून तो चहा चविष्ट लागतो, पण तसं नाही. टपरीवरचा चहा स्पेशल होण्यामागे दुधापेक्षाही महत्त्वाची असते ती म्हणजे 'चहा उकळण्याची पद्धत' आणि (Tapri style chai tips & tricks) मसाल्यांचं अचूक प्रमाण. जर आपल्यालाही वाटत असेल की, घरच्या (secret of Tapri style tea) चहाला टपरीवरील चहाची ती स्पेशल चव यावी यासाठी चहा कसा तयार करावा त्याची पद्धत पाहूयात...
चहाला परफेक्ट सुगंध येण्यासाठी नेमकं काय करावं ?
अनेकांना चहा तयार करताना आले आणि वेलची दोन्ही एकाच वेळी चहात घालण्याची सवय असते. यामुळे आपल्याला वाटते की, दोन्ही फ्लेवर्स चहात उतरतील, पण हीच सर्वात मोठी चूक असते. प्रत्येक मसाल्याचे स्वतःचे असे वेगळे वैशिष्ट्य आणि चव असते. त्याची खरी चव आणि सुगंध तेव्हाच बाहेर येतो जेव्हा तो योग्य वेळी चहामध्ये टाकला जातो. धाब्यावर चहा बनवणारे लोक ही गोष्ट उत्तमरित्या जाणतात, म्हणूनच ते आले आणि वेलची टाकण्याच्या वेळेची पूर्ण काळजी घेतात.
चहामध्ये आले कधी घालावे ?
आता प्रश्न असा पडतो की चहामध्ये आले नेमके कधी घालावे ? जर चहामध्ये आल्याचा खरा सुगंध आणि हलका तिखटपणा हवा असेल, तर लक्षात ठेवा की आले नेहमी पाणी उकळतानाच घालावे. पाण्यासोबत आले उकळल्यामुळे त्याची चव आणि सुगंध पूर्णपणे बाहेर येतो. जर आले चहामध्ये उशिरा टाकले, तर त्याचा सुगंध आणि चव चहामध्ये नीट उतरत नाही.
चहामध्ये वेलची कधी घालावी ?
वेलची हा एक अतिशय हलका मसाला आहे, ज्याचा सुगंध लवकर उडून जातो. जर वेलची चहामध्ये जास्त वेळ उकळली, तर तिचा सुगंध उडून जातो आणि फ्लेवर फिका पडतो. म्हणून, चहा सुगंधी बनवण्याची ट्रिक ही आहे की, वेलची नेहमी चहा तयार होत आल्यावर, म्हणजे गॅस बंद करण्याच्या २ ते ३ मिनिटे आधी घालावी. यामुळे वेलचीचा सुगंध चहामध्ये टिकून राहतो आणि प्रत्येक कपात आपल्याला चहाची टपरीसारखीच चव मिळते.
काही खास टिप्स...
१. आले जास्त उकळल्याने त्याची चव आणि तिखटपणा पूर्णपणे बाहेर येतो, म्हणून आले पाणी उकळतानाच टाकावे.
२. वेलची जास्त उकळल्याने तिचा सुगंध नाहीसा होतो.
३. दूध घातल्यानंतर वेलचीचा सुगंध चहामध्ये अधिक चांगल्या प्रकारे टिकतो.
४. आल्याचा स्वाद उत्तम येण्यासाठी ते नेहमी ताजे कुटूनच पाण्यात टाकावे.
घरी टपरीसारखाच चहा करण्याची सोपी पद्धत...
१. सर्वात आधी पाणी उकळायला ठेवा.
२. पाणी नीट उकळू लागल्यावर त्यात कुटलेले आले टाका.
३. त्यानंतर चहा पावडर आणि दूध घाला.
४. शेवटी वेलची टाकून २ ते ३ मिनिटे चहा उकळवून घ्या.
५. गॅस बंद करा आणि वाफाळलेला चहा गाळून घ्या.
