Join us

कामाची गोष्ट! पीठ मळल्यानंतर किती वेळात वापरता येतं, कधी खराब होतं, फ्रिजमध्ये ठेवायचं का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2025 19:37 IST

चपाती, भाकरी, पराठा बनवण्यासाठी दररोज सकाळी आणि संध्याकाळी घरांमध्ये पीठ मळलं जातं. पीठ मळल्यानंतर काही वेळाने ते वापरलं जातं.

चपाती, भाकरी, पराठा बनवण्यासाठी दररोज सकाळी आणि संध्याकाळी घरांमध्ये पीठ मळलं जातं. पीठ मळल्यानंतर काही वेळाने ते वापरलं जातं. बरेच लोक पीठ मळून फ्रिजमध्ये ठेवतात आणि एक किंवा दोन दिवस वापरतात. आरोग्य तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, पीठ मळल्यानंतर काही तासांतच वापरावं, अन्यथा ते खराब होऊ शकतं आणि आरोग्याला हानी पोहोचवू शकते. जर तुम्हाला बरेच दिवस मळलेलं पीठ वापरायची सवय असेल तर ती आताच बदला.

चक्कीतून दळून आणलेलं पीठ योग्यरित्या साठवलं तर ते एक किंवा दोन महिने चांगलं राहतं. पण जेव्हा आपण पीठ मळताना त्यात पाणी घालतो तेव्हा त्यात ओलावा येतो आणि त्याचं आयुष्य कमी होतं. मळलेलं पीठ खोलीच्या तापमानात ६ ते ८ तास चांगलं राहतं. जर वातावरणात खूप उष्णता असेल तर ते लवकर खराब होतं. खराब झालेल्या पदार्थापासून आरोग्याला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो.

फ्रिजमध्ये ठेवल्यास पीठ किती दिवस टिकतं? 

जर मळलेलं पीठ फ्रिजमध्ये हवाबंद डब्यात ठेवलं तर ते २ दिवस चांगलं राहतं. पण त्याची चव आणि रंग बदलू शकतो. जर तुमच्याकडे वारंवार लाईट जात असेल आणि फ्रिज बंद होत असेल, तर अशा स्थितीत पीठ १ दिवसापेक्षा जास्त काळ टिकणार नाही. २४ तासांच्या आत ते वापरणं चांगलं. फ्रिजमध्ये ठेवलेलं पीठ शक्यतो वापरून नये कारण ते आरोग्यासाठी घातक आहे. 

खराब झालेलं पीठ कसं ओळखायचं? 

जर पीठाला आंबट किंवा विचित्र वास येऊ लागला, ते काळं किंवा हिरवं पडलं, बुरशी किंवा चिकटपणा आला तर ते पीठ वापरण्यायोग्य नसल्याचं स्पष्ट लक्षण आहे. याशिवाय जर पीठ खूप कडक झालं तर ते खराब झालं आहे. पीठामध्ये मळताना आवश्यक असेल तितकच पाणी ओता. जास्त पाण्याचा वापर करू नये. 

खराब पीठ खाल्ल्यास कोणत्या समस्या उद्भवतात? 

डॉक्टरांच्या मते, खराब पीठात बुरशी किंवा बॅक्टेरिया वाढू शकतात, ज्यामुळे फूड पॉयझनिंग, पोटदुखी, उलट्या किंवा जुलाब होऊ शकतात. विशेषतः उन्हाळ्यात आणि पावसाळ्यात, लोकांनी ताजं पीठ वापरावं. जास्त वेळ पीठ मळून ठेवू नये. जर पीठाचा वास येत असेल किंवा चिकट वाटत असेल तर ते ताबडतोब फेकून द्यावं. लक्षात ठेवा की, छोटासा निष्काळजीपणा तुमच्या आरोग्याचं मोठं नुकसान करू शकतो. 

टॅग्स :अन्नआरोग्यहेल्थ टिप्स