महाराष्ट्राच्या खाद्यसंस्कृतीत ठेच्याला एक वेगळीच ओळख आहे. अगदी साधा, झणझणीत आणि तिखट असा हा ठेचा आज फक्त गावाकडच्या जेवणापुरता मर्यादित राहिलेला नाही, तर शहरातील हॉटेल्स, उपाहारगृहे आणि घराघरांतही तितक्याच आवडीने खाल्ला जातो. मलायका अरोराची ठेचा पनीर रेसिपी व्हायरल झाल्यावर फॅन्सी कॅफेमध्येही ठेचा मिळायला लागला.(Eat authentic desi thecha spicy fried rice once, you will love it for sure ) साध्या मिश्रणातून तयार होणाऱ्या ठेच्याची चव इतकी जबरदस्त असते की तो एकदा चाखला की विसरता येत नाही. कमी साहित्य, झटपट होणारा आणि तिखटाची मजा देणारा ठेचा त्यामुळेच लोकप्रिय ठरला आहे.
ठेचा भाकरी घरोघरी खाल्ली जाते. मात्र ठेचा भात कधी खाल्ला का? झणझणीत आणि चवीला एकदम जबरदस्त असा हा पदार्थ नक्की खा. करायला अगदी सोपा आहे. उरलेल्या भाताला फोडणी देण्याऐवजी एकदा असा ठेचा राईस करुन पाहा.
साहित्य
हिरवी मिरची, शेंगदाणे, आलं, लसूण, कोथिंबीर, तेल, भात, कडीपत्ता, मीठ
कृती
१. उरलेला भात घ्यायचा. किंवा मग ताजा भात लावायचा. तांदूळ शिजवून भात करायचा आणि तो गार करुन घ्यायचा. गरम भात वापरु नका. आदल्या दिवशीचा भात असेल तर उत्तम. नसेल तर गार वापरा. गरम भात नको. तो मऊ होईल आणि चवही हवी तशी नाही लागणार .
२. शेंगदाणे भाजून घ्यायचे. त्याची सालं काढून टाकायची. लसणाच्या काही पाकळ्या सोलून घ्यायच्या. कोथिंबीर निवडायची आणि स्वच्छ धुवायची आणि बारीक चिरायची. हिरव्या मिरचीचे तुकडे करायचे आणि ठेचून घ्यायची. आल्याचे तुकडे करायचे आणि ते ही ठेचून घ्यायचे. लसणाच्या पाकळ्या ठेचून घ्यायच्या. शेंगदाणेही जरा ठेचायचे. जाडसर पूड तयार करायची.
३. कढईत किंवा पॅनमध्ये तेल घ्यायचे. तेल जरा गरम झाले की त्यात कडीपत्ता घालायचा. कडीपत्ता छान परतायचा आणि नंतर त्यात ठेचा घालून परतून घ्यायचा. ठेचा छान परतल्यावर त्यात अख्खे भाजलेले शेंगदाणे घालायचे आणि मसाल्यात छान मिक्स करायचे. शेवटी भात घालायचा. चवीनुसार मीठ घालायचे आणि मिक्स करायचे. भात आणि ठेचा छान एकजीव करुन झाल्यावर त्यावर झाकण ठेवायचे आणि एक वाफ काढून घ्यायची.
