शेपूची भाजी पौष्टिक असली तरी अनेकांना ती खायला अजिबात आवडत नाही. ही भाजी चवीला तुरट असते. योग्य पद्धतीने स्वच्छता करुन ती विशिष्ट प्रकारे केली तर शेपूही चविष्ट होऊ शकते.व्यवस्थित काळजी घेतली तर शेपूची भाजी खूपच चविष्ट होते. यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घेणे आवश्यक आहे. (Does the shepu vegetable taste too bitter? No worries, remember these simple tips, some specific ingredients will make it tasty )शेपूची भाजी करताना सर्वात आधी कोवळी आणि ताजी शेपू निवडणे फार महत्त्वाचे आहे. फार जुनी किंवा जाड देठाची शेपू घेतली तर भाजी तुरटच लागते. शक्यतो फक्त पाने आणि कोमल देठ वापरावेत. जाड देठ वेगळे काढल्यास चव सुधारते.
शेपू नीट धुवून झाल्यावर ती थोडा वेळ चाळणीत ठेवून पाणी निथळू द्यावे. ओलसर शेपू थेट कढईत टाकली तर भाजी चिकट होते आणि तुरटपणा वाढतो. त्यामुळे पाणी पूर्ण निथळलेली शेपू वापरणे फायदेशीर ठरते. शेपूची भाजी करताना कांदा, लसूण आणि हिरवी मिरची यांचा वापर केल्यास तुरट चव कमी होते. कांदा नीट परतवून घेतल्यावर त्यात शेपू घाला भाजीला नैसर्गिक चव येते. थोडासा लसूण शेपूच्या वासालाही कमी करतो आणि चव वाढवतो. शेपूची भाजी शिजवताना ती फार वेळ शिजवू नये. जास्त शिजवली तर भाजी काळपट होते आणि तुरटपणा वाढतो. मध्यम आचेवर झाकण न ठेवता किंवा अर्धवट झाकण ठेवून भाजी परता. त्यामुळे पाण्याची वाफ बाहेर पडते आणि भाजी कोरडी व चविष्ट होते.
तुरटपणा कमी करण्यासाठी शेपूमध्ये थोडीशी चणा डाळ, परतून किंवा शिजवून घालायची. थोडे शेंगदाण्याचा कुट घालते तरी चव लगेच छान लागते. यामुळे भाजीला छान चव येते आणि तुरटपणा संतुलित होतो. काही जण थोडी कोकमाची साल किंवा आमसुल घालतात, त्यामुळे चव खुलते. शेपूची भाजी करताना मीठ शेवटी घालणे चांगले. सुरुवातीलाच मीठ घातल्यास शेपू जास्त पाणी सोडते आणि भाजी शिजताना तिची चव बिघडते. शेवटी मीठ घातल्याने भाजी हिरवी आणि चवदार राहते. थोडीशी साखर किंवा गूळाचा खडा शेवटी घातल्यास शेपूचा तुरटपणा कमी होतो आणि भाजीला हलकी गोडसर चव येते. मात्र हे प्रमाण अगदी कमी असावे, जेणेकरुन भाजीची मूळ चव बदलणार नाही. या छोट्या पण उपयुक्त टिप्स लक्षात ठेवल्यास शेपूची भाजी नक्कीच तुरट न होता छान रुचकर आणि पौष्टिक होईल. योग्य निवड, योग्य शिजवण्याची पद्धत आणि थोडीशी चव चांगली करणारे पदार्थ वापरणे हेच सोपे उपाय आहेत.
