Vata, Pitta, and Kapha : आजारी पडल्यानंतर डॉक्टरांकडे गेल्यावर बरेच डॉक्टर आपल्याला वात, पित्त, कफ या तीन गोष्टींबाबत काहीना काही सांगतात. आयुर्वेदानुसार हे तीन शरीरातील दोष आहेत. शरीराला नियंत्रित करणाऱ्या तीन मुख्य ऊर्जा आहेत. ज्यांचा थेट संबंध आपल्या आहाराशी असतो. जेव्हा हे तिन्ही दोष संतुलित राहतात, तेव्हा शरीर निरोगी राहतं आणि एनर्जेटिक जाणवतं. पण जर यांचं संतुलन बिघडलं तर अनेक प्रकारच्या शारीरिक आणि मानसिक समस्या डोकं वर काढू शकतात. अशात हे समजून घेणं गरजेचं आहे की, कोणत्या गोष्टींनी कोणता दोष वाढतो आणि कशामुळे तो शांत होऊ शकतो. जेणेकरून आपण निरोगी आणि फिट रहाल.
आयुर्वेदात जेवणाचे सहा मुख्य रस सांगण्यात आले आहेत. ज्यात गोड, आंबट, खारट, कडू, तिखट आणि तुरट यांचा समावेश आहे. या रसांचा आपल्या शरीरातील दोषांवर वेगवेगळा प्रभाव पडतो.
कशामुळे वाढतो वात दोष?
वात दोष वाढणाऱ्या टेस्टमध्ये तिखट, कडू आणि तुरट रसांचा समावेश आहे. जर एखादी व्यक्ती नेहमीच फार जास्त तिखट किंवा कडवट गोष्टी खात असेल तर त्यांचा वात वाढू शकतो. ज्यामुळे गॅस, कोरडेपणा, अस्वस्थता किंवा सांधेदुखीची समस्या होऊ शकते. वात संतुलित ठेवण्यासाठी गोड, खारट आणि आंबट टेस्ट फायदेशीर मानली जाते. तसेच थोडं गरम आणि हलकं तेलकट जेवणही वात शांत करू शकतं.
कशामुळे वाढतो पित्त दोष?
पित्त दोषाची समस्या अनेकांना होत असते. पित्ताचा संबंध शरीरातील उष्णता आणि पचन तंत्रासोबत असतो. तिखट, आंबट आणि खारट काही खाल्लं तर पित्त वाढू शकतं. जर एखादी व्यक्ती फार जास्त मसालेदार किंवा आंबट पदार्थ खात असेल तर शरीरात उष्णता वाढू शकते, ज्यामुळे अॅसिडिटी, जळजळ, चिडचिड किंवा त्वचेसंबंधी समस्या होऊ शकतात. पित्त शांत करण्यासाठी गोड, कडू आणि तुरट टेस्ट चांगली मानली जाते. थंड आणि हलकं जेवण, जसे की, हिरव्या पालेभाज्या आणि फळं पित्त शांत ठेवण्यास मदत करतात.
कशामुळे वाढतो कफ दोष?
कफ दोषाचा संबंध शरीरात स्थिरता, ओलावा आणि शक्तीशी असतो. गोड, खारट आणि आंबट पदार्थ अधिक खाल्ल्याने कफ दोष वाढतो. जर या टेस्टचे पदार्थ खाल्ले तर शरीर जड वाटणे, सुस्ती, वजन वाढणे किंवा कफ यांसारख्या समस्या होतात. कफ कमी करण्यासाठी तिखट, कडू आणि तुरटी टेस्ट फायदेशीर मानली जाते. हलकं गरम आणि मसालेदार जेवण कफ संतुलित करण्यास मदत करतं.
