उन्हाळा सुरू झाला की स्वयंपाकघरातील सगळ्यात मोठी चिंता म्हणजे अन्न लवकर खराब होणे. सकाळी बनवलेली भाजी दुपारपर्यंत आंबट होते, डब्यात नेलेल्या जेवणाला वास येतो किंवा काही पदार्थ पटकन बिघडतात. हे अनेकांच्या घरात रोजचं चित्र असतं. ( 5 things not to add while cooking in summer, food will be ruined )वाढलेल्या तापमानामुळे अन्नातील बॅक्टेरिया झपाट्याने वाढतात आणि त्यामुळे पदार्थ लवकर खराब होतात. म्हणूनच या दिवसांत काही पदार्थ जपून वापरणे किंवा शक्यतो टाळणे गरजेचे असते.
ओला नारळ हा उन्हाळ्यात सर्वात पटकन खराब होणाऱ्या पदार्थांपैकी एक आहे. नारळाची चटणी किंवा किस करून ठेवलेला नारळ काही तासांतच आंबट होऊ शकतो. त्यामुळे शक्यतो ताजा नारळ वापरावा किंवा लगेच संपेल इतकाच घ्यावा. डब्यासाठीच्या भाजीत शक्यतो नारळ वापरु नका. त्याचप्रमाणे कांदा देखील चिरून ठेवला, तर तो लवकर वास धरतो आणि त्याचा परिणाम भाजीवर होतो. त्यामुळे कांदा शक्यतो ताजा चिरुन वापरणेच योग्य. काही भाज्यांमध्ये वापरुच नका.
दूध आणि दुधाचे पदार्थही उन्हाळ्यात फार काळ टिकत नाहीत. दही, ताक, पनीर किंवा क्रीम यांसारखे पदार्थ जास्त वेळ बाहेर ठेवले, तर ते आंबट होतात किंवा खराब होतात. त्यामुळे हे पदार्थ फ्रिजमध्येच ठेवणे आणि वेळेवर वापरणे आवश्यक आहे. विशेषतः डब्यासाठी भाजी करताना दूध घातलेले पदार्थ टाळलेलेच बरे.
टोमॅटोचा जास्त वापर केलेल्या भाज्याही लवकर आंबट होऊ शकतात. टोमॅटोतील पाणी आणि आम्लता यामुळे भाजी पटकन खराब होण्याची शक्यता असते. तसेच पालक, मेथी यांसारख्या पालेभाज्या शिजवल्यानंतर जास्त वेळ ठेवल्या, तर त्यांचा स्वाद कमी होतो. उकडलेले बटाटे किंवा बटाट्याची भाजीही उन्हाळ्यात पटकन बिघडू शकते, विशेषतः जर त्यात कांदा किंवा नारळ असेल.
वाटणाचे पदार्थ वापरणे टाळा. तासाभरात खाणार तेव्हाच वाटण वापरा. वाटण जेवढे स्वादिष्ट असते तेवढेच पटकन खराब होतात. त्यामुळे वाटण करुन ठेवणे टाळा. ताजेच करा आणि वापरा. फ्रिजमध्ये ते चांगले राहते तरी काही प्रमाणात त्याची गुणवत्ता कमी होतेच. फळे भरपूर खा. फक्त ताजी खा , आणून ठेवलेली आठवडाभर खाऊ नका. ताजी फळे फार पौष्टिक असतात मात्र त्याची गुणवत्ता कमी झाली तर चव आणि पोषण दोन्ही बिघडते.
