निकिता पाटील
स्ट्रेस तर येतोच. कामाचा लोडही जास्त आहे. त्यात आता ही महामारी. यासाऱ्यावर मात करत "लंबी रेस का घोडा" व्हायचं असेल तर स्वतः ला शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या फीट ठेवण्याला पर्याय नाही. पण, हे करण्यामध्ये मोठी अडथळ्यांची रेस आहे. कामाच्या विचित्र वेळा , जंक फूड आणि कामाचा ताण. व्यक्तिगत आणि व्यावसायिकही कामाचा ताण जीवघेणा आहेच. त्यामुळे बॉडी क्लॉक पूर्ण बिघडत चालले आहे. अशावेळी मग एखादा त्रास झाल्यावरच आपल्याला काही प्रॉब्लेम आहे याची जाणिव होते आणि मग आपण त्यावर एखाद्या डाएट द्वारे, एखाद्या कोर्स द्वारे उत्तर शोधायचा प्रयत्न करतो.
या सर्व लाईफ स्टाईल च्या प्रश्नांना एकच उत्तर आहे " इंडियन वे ऑफ फिटनेस" ज्यात योग आणि प्राणायाम या दोन गोष्टींना सर्वाधिक महत्व आहे.
हे जितकं लिहायला ,बोलायला सोपे आहे तितकेच करायला अवघड आहे. पण, त्यासाठी एक दोन छोट्या गोष्टी केल्या तर हे फॉलो करणे सोपे जाते. त्यातली पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला रोज स्वतः साठी एक तास काढायचा आहे हे मनाशी घट्ट करणे आणि तो तास काढणेच. अनिल अंबानी सुद्धा जर का रोज सकाळी व्यायामासाठी एक तास काढत असतील तर आपण का काढू शकत नाही? त्यामुळे, प्रश्न हा वेळेचा नसतो तर प्रायोरीटीचा असतो. त्यामुळे, हे आपल्या स्वतः साठी आवश्यक आहे हे मनात बिंबवणे ही पहिली महत्वाची गोष्ट आहे.
दुसरी गोष्ट म्हणजे ‘लॉ ऑफ २१ डेज’ . हा नियम असे सांगतो की एखादी गोष्ट सलग २१ दिवस केली की त्याचे रूपांतर सवयीत होते व त्या गोष्टीची आपल्या शरीराला व मनाला सवय होते. त्यामुळे, शक्यतोवर एकदा योग, प्राणायाम सुरू केल्यावर त्यात सलग २१ दिवस खंड पडू नये हे पाहणे सगळ्यात जास्त गरजेचे आहे. त्यानंतर आपले शरीरच या सर्व व्यायामाची डिमांड करू लागेल. आणि जरी काही कारणाने एखादा दिवस खंड पडलाच तरी तो पुन्हा सुरू करून निदान २१ दिवसांचे आवर्तन पूर्ण होईल असे पाहिल्यास त्याची सवय लागेल हे नककी.
हे सगळं न करता पण आपण परफॉर्म करत राहतो तर कधीतरी शरीराची गाडी बंद पडणारच. ती असहकार पुकारणार. जगण्याची मॅरेथॉन खेळायची असेल तर त्याला दमसास हवाच..आणि त्यासाठी हवा फिटनेस!