गायत्री रामराव पगार
मला अजून आठवतं, २१ जानेवारी २०१८ हा दिवस. आमचे होंडा सिटी घेण्याचे स्वप्न पूर्ण झाले. वाटलं सारं छान चाललं आहे, आपण सेटल झालो. पण आयुष्य आपल्यासाठी भलतीच परीक्षा घेऊन समोर उभं ठाकतं. आणि प्राप्त परिस्थिती जे शिकवते ते शिकून आपण त्या परिस्थितीला तोंड देतो. ती परीक्षा उत्तीर्ण होण्यापलिकडे दुसरं आपल्या हातात काही नसतं. कॅन्सर आणि योगाभ्यास या दोन गोष्टींनी माझं जगणंच बदलून टाकलं त्याची गोष्ट योग दिनानिमित्त सांगते आहे.
खेडेगावात मी लहानची मोठी झाले. वयाच्या २१ व्या वर्षापर्यंत गायत्री कैलास काकडे होते. शेतकरी कुटुंब. माझे आई-वडील म्हणजे माझे आक्का-नाना शेतकरी. पण मला शिक्षणाची प्रचंड आवड होती. नवीन गोष्टी शिकण्याचा, त्या करण्याचा मला छंदच होता. माझं शिक्षण माझ्या गावातच पहिली ते दहावी झाले. दहावीत आम्ही गावातून दोनच मुली पास झालो. पुढचे शिक्षण एमएपर्यंत मामाकडे सटाणा येथे झाले. मोठं कुटूंब. लहान मोठ्या साऱ्या माणसांची मनं कशी जपायची, आपल्या माणसांमध्ये मानअपमान न ठेवता कसे संबंध ठेवायचे हे कळले. बाहेरच्या जगात माणसाने माणसाशी माणसागत वागावे हे शिक्षकांनी शिकविलेले ब्रीद अगदी आजही लक्षात आहे. मनमोकळा स्वभाव असल्याने स्वच्छंदी जगले.
मी एमएच्या शेवटच्या वर्षाला असतानाच विवाह झाला. लग्नानंतर सगळं छान चालले होते. मुलगा झाला. बीएड करायचं राहून गेलं. त्यात माझ्या मिस्टरांनी त्यांचा जॉब सोडला, त्यांनी एलआयसीच्या कामाला सुरुवात केली. मलाही एलआयसीची परीक्षा द्यायला लावली. आम्ही दोघांनी या कामात स्वतःला वाहून घेतलं. अगदी मुलाला साहिलला घेऊन आम्ही कॉलवर जायचो. आता लग्नाला २१ वर्षे झाली पण पतीने मला हे करू नकोस हे आजपर्यंत सांगितलं नाही. अगदी शून्यातून आम्ही सुरुवात केली. एकमेकांसोबत शिकत राहिलो. खारला आम्ही वन बीएचके फ्लॅट घेतला आणि 2012 सप्टेंबर चार रोजी आम्हाला दुसरे पुत्ररत्न झाले. दरम्यान मी ब्यूटी पार्लरचा कोर्सही केला. त्याचकाळात समजले की योगा कोर्सही करता येतो. मग मी तो डिप्लोमा कोर्सही केला. आणि पुढे सारं छान सुुरु असताना मला कॅन्सरने गाठलं.
माझे पती, भाऊ यांनी मला खूप आधार दिला. माझ्या मुलांनी मला कधीही एकटं सोडलं नाही. माझ्या पतीने मला एक क्षण एकटं वाटू दिलं नाही. त्यांनी कामधंदा सगळं काही बंद केलं. मला बरं वाटावं म्हणून शर्थीचे प्रयत्न केले. माझा भाऊ मिल्ट्रीत, त्याने दोन महिन्याची सुट्टी टाकली. माझे आई-वडील, भाऊ, सासूसासरे, मैत्रिणी सर्व माझ्यासोबत होते. कॅन्सर प्रचंड वेदना तर देतोच. पण त्यातून जगणंही शिकवतो. मी ही खचले, रडले पण मला माहित होतं की मला हिम्मत सोडून नाही चालणार! सगळं समर्पण केलं स्वामींच्या चरणी. आणि सोबत होता माझा योगाभ्यासही. मी योगशिक्षिका असल्याने यातून मला बाहेर पडण्यासाठी योगसाधनेचाही उपयोग झाला. योगाभ्यास, मेडिटेशन या गोष्टी इतक्या पावरफुल आहेत की आयुष्यभराची संपत्तीच. योगाभ्यासाने मन आणि शरीर यांचं संतुलन साधता येतं. आपण स्ट्रॉंग होतो मनाने आणि शरीरानेही.
कॅन्सरच्या किमोथेरपीच्या काळात दोन सायकलपर्यंत माझी तब्येत बरं होती पण तिसऱ्या सायकलला जणू माझ्या शरीराने रिस्पॉन्स कमी केला होता. डोक्यावर केस नाही. वजन कमी झालं होतं. एकटीला कुठं जाता येत नाही. जेवण दोन घासाच्या वर जात नाही. कसलीही तोंडाला चव नाही. चिडचिड व्हायची. नवऱ्याने साथ दिली खूप आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पॉलिसी होती त्यामुळे आर्थिक मदतही मिळाली. कॅन्सरमधून सावरल्यावरही माझा योगाभ्यास मी सुरुच ठेवला. त्यानंही माझी जगण्याची ताकद आणि उमेद वाढवली. मला सगळ्यांना एकच गोष्ट सांगायची आहे. नथिंग इज परमनंट. बदल आयुष्याचा अविभाज्य घटक आहे. तो स्वीकारावाच लागतो. आयुष्य खूप सुंदर आहे, ते भरपूर आनंदाने जगा. काल-उद्याची चिंता न करता आजचा दिवस जगा!