Join us  

वजन कमी करायचंय? फक्त ४ पथ्यं पाळा, वजन हमखास आटोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2022 1:18 PM

Fitness tips: वजन कमी करण्यासाठी प्रत्येक जण वेगवेगळे प्रयत्न करत असतो.. पण त्यासाठी जी एक गोष्ट सगळ्यात जास्त गरजेची आहे, त्याकडे मात्र सगळेच दुर्लक्ष करतात.. म्हणूनच तर वाढतं मग वजन...

ठळक मुद्देवजन कमी करण्यासाठी चयापचय क्रिया म्हणजेच शरीराचे मेटाबॉलिझम सुधारण्याची गरज आहे..

आपण जे काही अन्न पदार्थ खातो, ते जर व्यवस्थित पचले तर शरीरावर अतिरिक्त चरबी साठून राहत नाही. पण जर आपण खाल्लेलं चांगलं पचलं नाही, तर मग मात्र अपचनाचा त्रास तर होताेच, पण शरीरावरही चरबीचे थर साचायला सुरुवात होत जाते.. म्हणूनच जर वजन कमी करायचं असेल तर फक्त ४ पथ्य पाळा आणि शरीराचे मेटाबॉलिझम (metabolism) म्हणजे चयापचय क्रिया व्यवस्थित होते आहे की नाही, याकडे लक्ष द्या.. बस्स एवढं केलं तरी वजन एकदम आटोक्यात (how to loose weight) राहील असं सांगत आहेत तज्ज्ञ. 

 

चयापचय क्रिया म्हणजे आपण जे काही अन्न खातो तिथपासून ते खाल्लेल्या अन्नाचे पचन होऊन उत्सर्जन होईपर्यंतची क्रिया म्हणजे चयापचय क्रिया. लहान मुलांची चयापचय क्रिया अतिशय चांगली असते. त्यामुळे मुलं जे काही खातात, ते त्यांना व्यवस्थित पचत. त्यामुळेच मोठ्या माणसांच्या तुलनेत लहान मुलांच्या अंगावर चरबी साठून राहण्याचं प्रमाण खूप कमी असतं... त्यामुळेच जर अंगावर अतिरिक्त चरबी साठू द्यायची नसेल, तर सगळ्यात आधी चयापचय क्रिया सुधारणे गरजेचे आहे.

 

चयापचय क्रिया सुधारण्यासाठी या ४ गोष्टी करा...वजन कमी करण्यासाठी चयापचय क्रिया म्हणजेच शरीराचे मेटाबॉलिझम सुधारण्याची गरज असल्याचे डॉ. अमृता कुलकर्णी यांनी सांगितले आहे. याविषयीचा एक व्हिडिओ त्यांनी इन्स्टाग्रामला best_diet_tips_by_dr.amruta_ या पेजवर शेअर केला असून तो चांगलाचा व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये त्यांनी वजन कमी करण्यासाठी उपयुक्त अशा ४ सोप्या गोष्टी सांगितल्या आहेत...१. डाएट योग्य घ्या..(proper diet)चयापचय क्रिया सुधारायची असेल तर डाएट योग्य असणं अतिशय गरजेचं आहे.. त्यामुळे सगळ्यात आधी डाएटवर फोकस करा.. मैद्याचे पदार्थ वारंवार खाणं टाळा. घरचा सात्विक आहार जास्तीतजास्त घेण्याचा प्रयत्न करा..

 

२. भरपूर पाणी प्या.. (plenty of water)हा एक सल्ला नेहमीच अनेक डॉक्टरांकडून दिला जातो आणि बहुसंख्य लोक याच गोष्टीकडे दुर्लक्ष करतात. पण खाल्लेल्या अन्नाचे व्यवस्थित पचन होण्यासाठी भरपूर प्रमाणात पाणी पिणं गरजेचं आहे. दिवसातून ८ ते १० ग्लास पाणी तरी प्यायलं गेलंच पाहिजे.

 

३. व्यायाम करा.. (regular exercise)शरीर सुदृढ, निरोगी ठेवायचं असेल तर व्यायाम करणं गरजेचंच आहे. तरूण वयात अनेक जण व्यायाम करत नाहीत.. पण जसं पंचविशीच्या पुढे वय वाढत जातं, तसतसं मात्र प्रत्येकाची व्यायामाची गरज वाढत जाते. त्यामुळे चयापचय क्रिया सुधारण्यासाठी आणि शरीरावर अतिरिक्त चरबी साठू नये म्हणून व्यायाम करायलाच हवा.. 

 

४. पुरेशी झोप घ्या.. (proper sleep)शरीरातलं हार्मोन्सचं संतुलन बिघडलं तरी त्याचा परिणाम वजन वाढीवर होतो. त्यामुळे हार्मोन्स संतुलित ठेवायचे असतील, तर रात्री पुरेशी झोप घेणं खूप गरजेचं आहे. रात्री ७ ते ८ तास झोप घेतली गेली पाहिजे. म्हणूनच तर सध्या वाढलेले नाईट लाईफ कल्चर हे देखील वजन वाढीचे एक कारण आहे. 

 

टॅग्स :फिटनेस टिप्सहेल्थ टिप्सवेट लॉस टिप्सव्यायामआहार योजना