Holi Skin Care Tips: रंगपंचमी म्हणजेच धुळवडीला वेगवेगळे रंग खेळण्याचा, रंगांची उधळण करण्याचा मोह भल्या भल्यांना आवरत नाही. म्हणूनच होळी आणि धुळवडीची लोक वर्षभर आतुरतेने वाट बघत असतात. हा आनंदाचा सण आहे. पण अनेकदा काही योग्य ती काळजी न घेतल्याने रंगांमुळे त्वचेचं नुकसान होतं. एक दिवस रंग खेळण्याच्या धुंदीत त्वचेचं कधी कधी मोठंही नुकसान होतं. अशात जर रंगांमुळे त्वचेचं नुकसान होऊ द्यायचं नसेल तर एक सोपा उपाय करता येईल. तो म्हणजे त्वचेवर तेल लावणे. आपण आजी-आजोबांच्या काळापासून वापरला जाणारा एक सोपा घरगुती उपाय जाणून घेणार आहोत, ज्यामुळे होळीच्या दिवशी त्वचेचे बऱ्याच अंशी संरक्षण करता येते.
लावा खोबऱ्याचं तेल
औषधी गुणांनी समृद्ध असलेले खोबऱ्याचं तेल त्वचेसाठी खूप फायदेशीर मानलं जातं. होळीच्या दिवशी सकाळी उठल्यावर चेहरा, हात आणि पायांवर चांगल्या प्रकारे खोबऱ्याचं तेल लावा. तुम्ही केसांवरही हे तेल लावू शकता. असं केल्यावर तुम्ही निर्धास्तपणे होळीचा आनंद घेऊ शकता आणि रंग लावण्याची भीतीही वाटणार नाही.
रंग त्वचेवर घट्ट बसत नाही
खोबऱ्याचं तेल त्वचेचं संरक्षण कसं करतं असा प्रश्न पडू शकतो. प्रत्यक्षात खोबऱ्याचं तेल लावल्यानंतर त्वचेवर एक संरक्षणात्मक थर तयार होतो. या थरामुळे पक्के किंवा केमिकलयुक्त रंग त्वचेच्या आत खोलवर जाऊ शकत नाहीत. त्यामुळे रंग काढताना देखील ते सहज निघून जातात.
अनेक फायदे मिळतात
होळी खेळण्यापूर्वी त्वचा आणि केसांवर खोबऱ्याचं तेल लावल्याने त्यांचे नुकसान होण्यापासून संरक्षण मिळते. याशिवाय खोबऱ्याचं तेल त्वचा आणि केसांसाठी इतरही फायदेशीर आहे. कोरडी आणि निस्तेज त्वचा मऊ करण्यासाठी याचा उपयोग होतो. तसेच केस सिल्की आणि चमकदार ठेवण्यासाठी केस धुण्याच्या सुमारे १–२ तास आधी नारळाचे तेल लावणेही फायदेशीर ठरते.
