केसांत सतत खाज येणे आणि डोक्यावर पांढर्या कोंड्याचे कण दिसणे आत्मविश्वास कमी करते. कोंड्यामुळे येणारी खाज कधी कधी इतकी असह्य होते की केस विंचरताना, झोपताना किंवा काम करतानाही त्रास होतो. ही खाज केवळ अस्वस्थ करत नाही तर वेळेवर काळजी न घेतल्यास केसगळती, टाळूवर जखमा आणि संसर्ग होण्याची शक्यताही वाढते. सतत खाजवल्यामुळे रक्त ही येते आणि डोक्यावरील त्वचा झोंबतेही. कोंड्यामुळे खाज येण्यामागे टाळू कोरडा होणे, त्वचेवर साचलेली घाण, जास्त घाम येणे, बुरशीजन्य संसर्ग किंवा चुकीचे केसांचे प्रॉडक्ट वापरणे ही कारणे असू शकतात. सतत केमिकलयुक्त शाम्पू, फार गरम पाण्याने अंघोळ किंवा केस ओले ठेवणे यामुळेही कोंडा वाढतो आणि खाज अधिक तीव्र होते.
असह्य खाज कमी करण्यासाठी सर्वात महत्त्वाचे म्हणजे टाळू स्वच्छ आणि कोरडा ठेवणे. आठवड्यातून दोन ते तीन वेळा सौम्य, कोंडा कमी करणाऱ्या आयुर्वेदिक शाम्पूने केस धुणे फायदेशीर ठरते. फार जास्त वेळ शाम्पू टाळूवर ठेवू नये आणि केस धुतल्यानंतर नीट पाणी ओतून स्वच्छ करावेत, जेणेकरुन तो टाळूवर राहणार नाही. नैसर्गिक उपायही खाज कमी करण्यासाठी उपयोगी पडतात. नारळ तेल, तिळाचे तेल किंवा बदाम तेल यासारखी हलकी तेले टाळूवर हलक्या हाताने लावल्याने कोरडेपणा कमी होतो आणि खाजेला आराम मिळतो. काही वेळा तेल लावल्यानंतर कोमट पाण्याने केस धुतल्यास टाळू मऊ राहतो. दही किंवा कोरफडीसारखे थंडावा देणारे घटकही टाळू शांत ठेवण्यास मदत करतात.
केस विंचरताना किंवा खाज येते म्हणून नखे वापरुन टाळू खाजवणे टाळावे. यामुळे त्वचेवर सूक्ष्म जखमा होतात आणि कोंडा आणखी वाढू शकतो. तसेच फार घट्ट हेअरस्टाईल, सतत हेल्मेट किंवा टोपी घालणे यामुळेही घाम साचून खाज वाढते. आहाराचाही कोंड्यावर आणि खाजेवर परिणाम होतो. पुरेसे पाणी पिणे, हिरव्या भाज्या, फळे, ओमेगा-३ असलेले पदार्थ आणि जीवनसत्वे यांचा आहारात समावेश केल्यास त्वचा आतून चांगली होते. जास्त तेलकट, तिखट आणि जंक फूड कमी केल्यास कोंड्याची समस्या हळूहळू आटोक्यात येते.
जर घरगुती उपाय करुनही खाज थांबत नसेल, टाळू लालसर होत असेल किंवा खूप दाह जाणवत असेल तर त्वचारोगतज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. योग्य उपचार आणि नियमित काळजी घेतल्यास कोंड्यामुळे येणारी असह्य खाज नक्कीच कमी करता येते आणि केसही निरोगी राहतात.
