आत्मनिर्भर भारत... मुंबई विमानतळावरुन कोरोनाची 'लस निघाली परदेशाला'

By महेश गलांडे | Published: January 20, 2021 09:04 AM2021-01-20T09:04:26+5:302021-01-20T09:14:44+5:30

देशात कोरोना महामारीविरोधात लढण्यासाठी केंद्र सरकारने काही दिवसांपूर्वी भारतातील २ कोरोना लसींना आपत्कालीन वापरासाठी परवानगी दिली आहे. सीरम इंस्टिट्यूटची कोविशिल्ड आणि भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन यांचा यात समावेश आहे.

त्यानंतर भारतात 16 जानेवारीपासून लसीकरण मोहिमेलाही सुरुवात झाली असून देशभरात या लसीकरणाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या लसींचे हे डोस देण्यात येत आहेत.

पुण्यातील सीरम इंस्टीट्युटमधून कोविशिल्ड लसीचे 3 ट्रक पहाटेच्या सुमारास रवाना झाले होते, त्यावेळी सोशल मीडियावर या फोटोंना चांगला प्रतिसाद मिळाला. विशेष म्हणजे अनेकांनी हा कोरोनाविरुद्धच्या लढाईतील विजय असल्याचं म्हटंल.

याच दरम्यान फिलीपींस सरकारने सीरम इंस्टिट्यूटसोबत मोठा करार केला आहे. या करारानुसार सीरम इंस्टिट्यूट फिलीपींसला ३० मिलियन म्हणजे ३ कोटी कोविशिल्ड कोरोना लसीचा पुरवठा करणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतातील कोरोना लस उत्पादन करण्याची क्षमता मानवतेच्या दृष्टीकोनातून मदत करण्यास तयार आहे असं सांगितले आहे.

जगभरातील ६० टक्के लसीचं उत्पादन भारतात होतं, आजाराविरुद्ध वापरण्यात येत असलेल्या तीन लसींपैकी एका लसीवर मेड इन इंडिया शिक्का लागला आहे. संयुक्त राष्ट्र संघासारखी जागतिक संस्था त्यांच्या गरजेसाठी ६०-८० टक्के लस भारताकडून विकत घेते

भारतामध्ये बनविण्यात आलेल्या कोरोना लसी मिळविण्यासाठी शेजारी देशांसह इतर खंडातील अनेक देशांनी आता प्रयत्न सुरू केले आहेत. या देशांना कोरोना लसीचा पुरवठा करण्याचा भारताचा विचार आहे.

कोरोना साथीवर कोविशिल्ड, कोव्हॅक्सिन लस विकसित झाल्यानंतर आता हे देश भारताकडे आशेने पाहू लागले आहेत. कोरोना लसी घेण्यासाठी म्यानमार व दक्षिण आफ्रिका यांनी याआधीच भारताशी करार केला आहे. नेपाळ, श्रीलंका हे शेजारी देश तसेच कझाकस्तान हे कोरोना लस मिळविण्यासाठी भारताच्या संपर्कात आहेत.

मध्य आशियातील देशांनाही कोरोना लसीचा मोठ्या प्रमाणावर पुरवठा करण्याची योजना भारताने आखली आहे. त्यामध्ये बांगलादेश, भूतान, मालदीव, व्हिएतनाम, कंबोडिया, किरगिझस्तान, उझबेकिस्तान या देशांचा समावेश आहे.

भारताच्या या धोरणानुसार 1.5 लाख कोरोना लसींचे डोस भुतानला पाठविण्यात आले आहेत. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावरुन विमानाने या लशींचे डोस भुतानमधील थिंपुआला पाठवले.