"मुंबईत माझं घर नाही हे नशीब, नाही तर मला..."; देवेंद्र फडणवीसांचा शिवसेनेला टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2022 02:53 PM2022-06-11T14:53:03+5:302022-06-11T14:57:26+5:30

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवरही फडणवीसांनी साधला निशाणा

Devendra Fadnavis slams Shivsena Rajya Sabha Elections 2022: राज्यसभेच्या सहा पैकी तीन जागांवर भाजपाचे उमेदवार निवडून आले. सहाव्या जागेसाठी चांगलीच चुरस होती.

अखेर शिवसेनेच्या संजय पवारांना दोन मतांनी पराभूत करत भाजपाच्या धनंजय महाडिकांनी बाजी मारली.

या विजयाचा जल्लोष व विजयोत्सव आज मुंबईत साजरा करण्यात आला. त्यावेळी भाष्य करताना देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत घर नसल्यामुळे मी नशीबवान आहे, असा टोला शिवसेनेला लगावला.

माजी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "राज्यसभेच्या निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर सरकार व विद्यमान मुख्यमंत्र्यांनी अंतर्मुख होऊन विचार करायची गरज आहे. केवळ भाजपाशी लढायचं म्हणून महाराष्ट्राचं नुकसान महाविकास आघाडी करत आहे."

"शेतकऱ्यांची अवस्था वाईट आहे. विमा कंपन्यांचा फायदा होत असूनही सरकार गप्प आहे. राज्यातील प्रोजेक्ट बंद आहे आणि लोडशेडिंग सुरू आहे. अशा प्रकारांमुळे राज्य मागे चाललं आहे. पण हे सरकार मात्र याची घरं तोड, त्याची घरं तोड यातच व्यस्त आहे."

"मुंबईत घर नसल्याने मी मात्र नशीबवान आहे. नाही तर, नारायण राणेंसारखीच मलाही नोटीस आलीच असती. माझं नागपूरचं घर नियमाच्या चौकटीत आहे. आणि मुंबईत नोटीस पाठवायची असेल तर त्यांना शासकीय बंगल्याला नोटीस पाठवावी लागेल", असा टोला त्यांनी लगावला.

पुढे बोलताना ते म्हणाले, "मोदींच्या कामावर विश्वास ठेवून महाराष्ट्राने आमच्या युतीला सत्ता दिली. पण सत्तेचा अपमान झाला."

"शिवसेनेने युती तोडली आणि वेगळ्यांसोबत सरकार स्थापन केलं. पण आता हे सरकार तरी चालवून दाखवा. बेईमानीने राज्य घेतलं असलं तरी राज्यकर्ते आहात लक्षात घ्या."

"समाजातील घटकाचा विचार केला जात नाहीये हे खूप खराब राजकारण सुरू आहे. त्यामुळे बदला घेण्याचे राजकारण करू नका", असा सल्ला देवेंद्र फडणवीसांनी शिवसेनेला आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना दिला.