सेना विरुद्ध राणा! भाजपचे तीन मोठे नेते लागले कामाला; अडचणीत येणार शिवसेना?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2022 08:23 PM2022-04-23T20:23:21+5:302022-04-23T20:28:23+5:30

भाजप इन ऍक्शन; तीन बडे नेते कामाला लागले; शिवसेना अडचणीत येण्याची शक्यता

हनुमान चालिसा पठणावरून पेटलेला वाद थेट अटकेपर्यंत पोहोचला आहे. मातोश्रीच्या बाहेर जाऊन हनुमान चालिसा पठण करू, असा इशारा देणाऱ्या खासदार नवनीत राणा, आमदार रवी राणांना अटक झाली आहे.

समाजात तेढ निर्माण करणारी विधानं केल्या प्रकरणी त्यांच्याविरोधात अटकेची कारवाई झाली आहे. कलम १५३ (अ) च्या अंतर्गत त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे राणा दाम्पत्याच्या अडचणीत वाढ झाली आहे.

पोलिसांनी राणा दाम्पत्याला खार पोलीस ठाण्यात नेताच राणा यांनी एक व्हिडीओ जारी केला. या व्हिडिओमध्ये नवनीत राणा यांनी राज्याचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना साद घातली.

पोलिसांनी आम्हाला जबरदस्तीने पोलीस ठाण्यात नेले आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि मंत्री नारायण राणेंच्या राज्यात लोकशाही धोक्यात आली आहे. आम्हाला मदत करावी, असं राणा म्हणाल्या.

राणा यांच्या मदतीसाठी भाजपमधील बडे नेते उभे राहत असल्याचं चित्र दिसत आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर तोफ डागली आहे. पोलिसांनी राणा दाम्पत्याची त्यांची घरातून सुटका केली नाही तर मी खारला जाईन आणि त्यांना सुरक्षित बाहेर घेऊन येईन, असं म्हणत राणे राणांसाठी थेट मैदानात उतरले.

पोलिसांनी राणा दाम्पत्याची खारच्या घरातून सुरक्षित सुटका केली. त्यामुळे नारायण राणेंना तिथे जावं लागलं नाही. राणा दाम्पत्याला घेऊन पोलिसांनी खार पोलीस स्टेशन गाठलं. भाजप खासदार किरीट सोमय्या रात्री ९ वाजता खार पोलीस स्टेशनमध्ये जाणार आहेत. त्यामुळे सोमय्यादेखील राणांच्या मदतीला उतरल्याचं स्पष्ट आहे.

राणांच्या अटकेवरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर तोफ डागली आहे. इतकी दंडुकेशाही? इतका अहंकार? इतका द्वेष, इतकी दंडुकेशाही ? इतका अहंकार? इतका द्वेष? सत्तेचा इतका माज? सरकारच करणार हिंसाचार, एवढीच तुमची मदुर्मकी? अशा शब्दात देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

राणा दाम्पत्याला अटक होताच भाजप आक्रमक झाला आहे. तर अटकेत असलेल्या राणा दाम्पत्यानं थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह शिवसेनेच्या बड्या नेत्यांविरोधात तक्रार नोंदवली आहे. आपल्या घराबाहेर जमाव जमवून गर्दी करणे. तसेच आपल्या जीविताला धोका निर्माण करण्याचा प्रयत्न करणे, अशा प्रकारची तक्रार राणा दाम्पत्याने केली आहे. संजय राऊत यांनी प्रक्षोभक विधाने करून शिवसैनिकांना चिथावणी दिल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.