समृद्धी महामार्गावर वाहने वाढली, अपघात घटले; एमएसआरडीसीचे एमडी गायकवाड यांचे स्पष्टीकरण
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2026 09:40 IST2026-05-19T09:40:24+5:302026-05-19T09:40:33+5:30
‘लोकमत काॅफी टेबल’ चर्चेत अनिलकुमार गायकवाड म्हणाले की, समृद्धीवरून आलेल्या वाहनांना ठाण्यात जलदगतीने येण्यासाठी वडपे-ठाणे हा मार्ग महत्त्वाचा आहे. त्याअनुषंगाने कळवा आणि कशेळी खाडीवरील पुलांची कामे पूर्ण होऊन ते वाहतुकीसाठी खुले केले आहेत

समृद्धी महामार्गावर वाहने वाढली, अपघात घटले; एमएसआरडीसीचे एमडी गायकवाड यांचे स्पष्टीकरण
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : समृद्धी महामार्गावरील अपघातांच्या आकड्यांकडे पाहिले तर २०२४ या वर्षाच्या तुलनेत २०२५ मध्ये अपघात काहीसे जास्त दिसतात. मात्र, प्राणघातक अपघातांचे प्रमाण कमी आहे. समृद्धीवर पहिल्या वर्षी ९० हजार वाहनांमागे एक मृत्यू झाला होता. गेल्या वर्षी हे प्रमाण १ लाख १८ हजार वाहनांमागे एक मृत्यू असे होते. त्यामुळे या महामार्गावर वाहने वाढली असून, त्या वाहनांच्या तुलनेत अपघातांत घट झाल्याचे दिसून येते, असे स्पष्टीकरण महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे (एमएसआरडीसी) अनिलकुमार गायकवाड यांनी दिले. आपल्याकडे लोकांना एक्स्प्रेस-वे वापरण्याची सवय नाही, तसेच या महामार्गांवर वाहने चालविताना नियमांचे पालन होत नाही. त्यातून अपघात घडत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
‘लोकमत काॅफी टेबल’ चर्चेत अनिलकुमार गायकवाड म्हणाले की, समृद्धीवरून आलेल्या वाहनांना ठाण्यात जलदगतीने येण्यासाठी वडपे-ठाणे हा मार्ग महत्त्वाचा आहे. त्याअनुषंगाने कळवा आणि कशेळी खाडीवरील पुलांची कामे पूर्ण होऊन ते वाहतुकीसाठी खुले केले आहेत
‘समृद्धी’वर ‘वेसाइड ॲमेनिटीज’ची कामे सुरू
समृद्धी महामार्गावर सध्या २२ ठिकाणी पेट्रोलपंप सुरू झाले आहेत. त्याठिकाणी प्रवाशांसाठी काही सुविधा उपलब्ध केल्या आहेत. महामार्गांवर ४० किमी अंतरावर ‘वेसाइड ॲमेनिटीज’ असणे अपेक्षित असते. त्यानुसार समृद्धीवर या सुविधा तयार करण्याचे काम सुरू झाले आहे. सरकारी जागा असलेल्या १६ ठिकाणी ‘वेसाइड ॲमेनिटीज’साठी निविदा अंतिम करून कामे सुरू झाली आहेत, तर ६ ठिकाणी सरकारी जागा उपलब्ध होऊ शकली नाही. या ६ ठिकाणी लँड पुलिंगमध्ये जमीन घेऊन कामे करणार आहोत. यातील ४ ठिकाणांच्या जागा अंतिम होऊन कामे सुरू झाली आहेत. दोन ठिकाणचे काम अद्याप सुरू होणे बाकी आहे, असेही गायकवाड यांनी सांगितले.
१५ ठिकाणी नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्ती
समृद्धी महामार्गावर १८ ठिकाणी नवनगरे वसविण्यासाठी एमएसआरडीसीला प्राधिकृत करण्यात आले होते. या टाउनशिप लँड पुलिंग मॉडेलवर विकसित केल्या जाणार होत्या. त्यासाठी शेतकऱ्यांना ३० टक्के विकसित भूखंड व पुढील १० वर्षे ठरावीक नुकसानभरपाई दिली जाणार होती. मात्र, शेतकऱ्यांना थेट रोख रक्कम हवी होती. त्यातून लँड पुलिंगसाठी तेवढा प्रतिसाद मिळाला नाही. परिणामी, आता समृद्धीवर इंटरचेंजजवळ १५ ठिकाणी एमएसआरडीसीला विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्त करण्याचा प्रस्ताव सरकारकडे आहे. त्याला लवकरच मान्यता मिळेल. यानंतर या इंटरचेंजजवळ ५ किमीच्या परिघात एमएसआरडीसी विशेष नियोजन प्राधिकरण असेल, असेही गायकवाड यांनी सांगितले.