ट्रॅव्हल्सकडून प्रवाशांची लूट; तिकीट दरांमध्ये दुप्पट-तिप्पट वाढ : परिवहन विभागाचे नियंत्रण नसल्याची जनतेची तक्रार
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2026 11:39 IST2026-05-04T11:36:47+5:302026-05-04T11:39:05+5:30
महामुंबई क्षेत्रातून दररोज शेकडो खासगी बस सुटतात आणि सुट्ट्यांच्या काळात प्रवाशांची मागणी वाढल्याने बसची संख्या वाढविली जाते, त्याचवेळी तिकीट दरही वाढविले जातात.

ट्रॅव्हल्सकडून प्रवाशांची लूट; तिकीट दरांमध्ये दुप्पट-तिप्पट वाढ : परिवहन विभागाचे नियंत्रण नसल्याची जनतेची तक्रार
मुंबई : उन्हाळी सुट्ट्यांमुळे एसटीने हंगामी भाडेवाढ केली असतानाच खासगी ट्रॅव्हल्सकडून तिकिटांचे दर दुप्पट-तिप्पट वाढवून प्रवाशांची लूट करण्यात येत आहे. विशेषत: कोल्हापूर, कोकण, सोलापूर आणि नाशिक या मार्गांवर तिकिटांचे दर भरमसाट वाढविण्यात आले असून, त्यावर परिवहन विभागाचे कोणतेही नियंत्रण नाही. त्यामुळे प्रवाशांना वाढीव भाडे मोजावे लागत असून त्यांच्यात मोठी नाराजी आहे.
महामुंबई क्षेत्रातून दररोज शेकडो खासगी बस सुटतात आणि सुट्ट्यांच्या काळात प्रवाशांची मागणी वाढल्याने बसची संख्या वाढविली जाते, त्याचवेळी तिकीट दरही वाढविले जातात.
सध्या एसी स्लीपरसाठी २,००० ते २,५०० रुपये, तर सीटिंगसाठी १,५०० ते १,८०० रुपये आकारले जात आहेत. हेच तिकीट एरवी ६०० ते ८०० रुपयांत उपलब्ध असते.
‘सणासुदीच्या हंगामाचा फायदा घेत भाडेवाढ’
गणपती, दसरा, दिवाळी, होळीचा सण तसेच उन्हाळी सुट्ट्यांमध्ये बाहेरगावी जाणाऱ्यांची संख्या मोठी असते. मात्र एसटी आणि रेल्वेची तिकिटे ऐनवेळी मिळत नसल्याने प्रवासी खासगी ट्रॅव्हल्सकडे वळतात. याच संधीचा फायदा घेत दरवाढ केली जात असल्याची तक्रार प्रवाशांकडून होत आहे.
तिकीट दर (अंदाजे रुपयांत)
मार्ग इतर वेळेस उन्हाळी हंगामात
परळ-कोल्हापूर ६०० १,५०० ते २,५००
मुंबई-मालवण ६०० १,२०० ते २,०००
मुंबई-सोलापूर ५५० १,२०० ते २,५००
मुंबई-नाशिक ५०० ८०० ते १,०००
मुंबई- रत्नागिरी ५०० ते ६०० १,२०० ते २,०००
वर्षभर आमचे दर हे शासकीय गाड्यांच्या तुलनेत समान किंवा कमी असतात. मात्र मेंटेनन्स, ईएमआय आणि कर्मचाऱ्यांचे वेतन यांचा ताण लक्षात घेता सणासुदीच्या काळात दर वाढविणे गरजेचे ठरते.
प्रदीप पाटील, खासगी ट्रॅव्हल्स मालक
कोल्हापूरसाठी एसटीच्या थेट जादा गाड्या नाहीत आणि रेल्वेचे तिकीट मिळणे कठीण असते. त्यामुळे महागडे तिकीट घेण्याशिवाय पर्याय नसतो. शासनाने कोकणप्रमाणे पश्चिम महाराष्ट्रासाठीही जादा गाड्या सुरू कराव्यात.
रोहन पवार, प्रवासी २३ हजारांचा खर्च
वाहतूकदारांच्या मते, मुंबई-कोल्हापूर एका फेरीसाठी २२ ते २३ हजार रुपयांचा खर्च येतो. एसी बससाठी आणखी २ ते ३ हजारांची भर पडते. डिझेल, टोल, देखभाल खर्च यामुळे खर्च वाढतो. सुट्ट्यांच्या काळात बस फुल्ल भरल्या जातात, मात्र परतीच्या प्रवासात अनेकदा बस रिकाम्या जातात. त्यामुळे दोन्ही बाजूंचा खर्च एका फेरीत वसूल करण्यासाठी दर वाढवावे लागतात.