"शिवसेनेवर एवढे वाईट दिवस आलेले नाहीत, सत्ता...!", मुंबई महापौर पदासंदर्भात राऊत स्पष्टच बोलले
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2026 15:33 IST2026-01-23T15:32:47+5:302026-01-23T15:33:35+5:30
"बघा पक्ष निर्णय घेईल. भारतीय जनता पक्ष कोणत्याही परिस्थितीत महापौर पद सोडणार नाही."

"शिवसेनेवर एवढे वाईट दिवस आलेले नाहीत, सत्ता...!", मुंबई महापौर पदासंदर्भात राऊत स्पष्टच बोलले
महानगर पालिका निवडणुकीनंतर मुंबईचा महापौर कोण होणार? यासंदर्भात केवळ मुंबईच नव्हे तर, संपूर्ण राज्यातील राजकीय वर्तुळातच जोरदार चर्चा सुरू आहे. सर्वच जण आपापल्या पद्धतीने तर्क लावताना दिसत आहेत. यातच, एकनाथ शिंदे यांचा पाठिंबा घेण्यासंदर्भात विचारले असता, राऊत आधी म्हणाले, "पक्ष निर्णय घेईल. भारतीय जनता पक्ष कोणत्याही परिस्थितीत महापौर पद सोडणार नाही." यावर, आपण म्हणालात, पक्ष निर्णय घेईल...? असे विचारले असता, "काय करायचं यापुढे? शिंदेंचा पाठिंबा घेणार नाही. शिवसेनेवर एवढे वाईट दिवस आलेले नाहीत." असे राऊत यांनी म्हटले आहे. ते येथे पत्रकारांशी बोलत होते.
...तर त्यांनी बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना फोडली नसती -
भास्कर जाधव यांनी म्हटले आहे की, शिवसेनेचा महापौर बसायचा असेल तर, शिवसेना शिंदे गटाने उद्धव ठाकरे यांना पाठिंबा द्यावा. म्हणजे, या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने मुंबईत शिवसेनेचा महापौर बसेल. आपली काय इच्छा आहे? यावर, शिवसेना नेते संजय राऊत म्हणाले, "बघा पक्ष निर्णय घेईल. भारतीय जनता पक्ष कोणत्याही परिस्थितीत महापौर पद सोडणार नाही. ते शिवसेना प्रमुखांचे फोटो वैगेरे राजकीय स्वार्थासाठी वापरतात. तसं नसतं तर त्यांनी बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना फोडली नसती."
बाळासाहेबांचा धनुष्यबाण तुम्ही नामर्दांच्या हातात दिला -
राऊत पुढे म्हणाले, "ज्या बाळासाहेब ठाकरेंनी भारतीय जनता पक्षाचं अस्तित्व महाराष्ट्रात निर्माण करून दिलं, त्यांचं अस्तित्वच नव्हतं. ते बाळासाहेबांनी निर्माण करून दिलं. आणि त्याच बाळासाहेबांचा पक्ष तुम्ही फोडलात आणि शिवसेनेची काडीमात्र संबंध नसलेल्या एका व्यक्तीच्या हातात ठेवला. बाळासाहेबांचा धनुष्यबाण तुम्ही नामर्दांच्या हातात दिला. अशा भारतीय जनता पक्षाकडून कोणती अपेक्षा करणं चुकीचं आहे."
एवढे वाईट दिवस आलेले नाहीत -
आपण म्हणालात, शिंदेंचा पाठिंबा घ्यायचा की नाही? पक्ष निर्णय घेईल...? यावर राऊत म्हणाले, "काय करायचं यापुढे? शिंदेंचा पाठिंबा घेणार नाही. शिवसेनेवर एवढे वाईट दिवस आलेले नाहीत. सत्ता मिळाली नाही, म्हणून आमचा जीव तडफडत नाही. आम्ही कळवळत नाही. भारतीय जनता पक्षाला जी सत्तेची राक्षसची हाव सुटलेली आहे. ती तुम्हाला दिसते आहे. ज्या पद्धतीनं त्यांनी निवडणूका लढवल्या जिंकल्या पैशाचा वापर करून हा काय बाळासाहेबांचा विचार नव्हता."