“धुके नव्हते, तो शेवटचा व्हिडिओ...”; अजितदादांच्या अपघातावर शर्मिला ठाकरे स्पष्टच बोलल्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2026 19:34 IST2026-02-28T19:33:35+5:302026-02-28T19:34:22+5:30
Sharmila Raj Thackeray News: रोहित पवार कोणावरही आरोप करत नाहीत, मग पोलीस का घाबरत आहेत? असा सवाल शर्मिला राज ठाकरे यांनी केला आहे.

“धुके नव्हते, तो शेवटचा व्हिडिओ...”; अजितदादांच्या अपघातावर शर्मिला ठाकरे स्पष्टच बोलल्या
Sharmila Raj Thackeray News: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाती निधनाला एक महिना पूर्ण झाला. अद्यापही संपूर्ण महाराष्ट्र अजित पवार यांच्या निधनाबाबत हळहळ व्यक्त करताना दिसत आहे. या महिन्याभरात अनेक घडामोडी घडल्या. रोहित पवारांनी या विमान अपघातावर शंका व्यक्त करत अनेक प्रश्न उपस्थित केले. तर दुसरीकडे सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपद, पालकमंत्रीपद आणि पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारत राजकारणात सक्रीय सहभागी झाल्या आहेत. यातच रोहित पवार यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली आणि अजित पवार यांच्या घातपाताच्या संशयाबाबत पाठिंबा देण्याचे आवाहन केले. यानंतर आता शर्मिला राज ठाकरे यांनीही याबाबत स्पष्ट शब्दांत प्रतिक्रिया दिली.
अजित पवार यांच्या मृत्यूप्रकरणी सरकार एफआयआर का नोंदवून घेत नाही? सरकार एफआयआर नोंदवून घेण्यासाठी का घाबरत आहे? असे प्रश्न उपस्थित करून अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत सरकारच संशय निर्माण करत आहे, असा आरोप राज ठाकरेंनी केला. एफआयआर नोंदवण्यासाठी गेलेल्या व्यक्तीला जर सरकारच अडथळे निर्माण करत असेल तर याच्या मागे काही काळेबेरे आहे का? असा संशय निर्माण होतो, असे राज ठाकरे म्हणाले. यानंतर आता शर्मिला ठाकरे यांनीही याबाबत मत व्यक्त केले आहे.
धुके नव्हते, तो शेवटचा व्हिडिओ...
अजित पवारांच्या अपघाताबाबतचे व्हिडिओ अनेक चॅनेल्सने दाखवले. तिथे कुठेही धुके नव्हते. तिथल्या एका माणसाने तिकडचा एक शेवटचा व्हिडिओही काढला. त्यातही दिसतेय की विमान तिरके होऊन पडले. विमान लँड झालेच नव्हते. त्यामुळे विमान अपघात कशामुळे झालाय, हे पाहिले पाहिजे. एवढा मोठा माणूस अपघातात जातो, त्याचा साधा एफआयआरलही घेत नाहीत? रोहित पवार कोणावरही आरोप करत नाहीत, मग पोलीस का घाबरत आहेत? तुम्ही एफआयआर तर घ्या ना. त्यांनी कोणत्याही माणसावर आरोप केलेले नाहीत, असे त्या म्हणाल्या.
दरम्यान, अजित पवार यांच्या विमानाला झालेल्या भीषण अपघाताबाबतची प्राथमिक माहिती डीजीसीएने २२ पानी अहवालाच्या माध्यमातून मांडली आहे. या अहवालातून समोर आलेल्या माहितीनुसार अजित पवार हे मुंबईहून बारामतीला जात होते ते विमान अपघात होण्यापूर्वी काही काही क्षण आधी एका झाडाला आदळले आणि नंतर जमिनीवर कोसळले. सकाळी ८ वाजून ४६ मिनिटांनी हा अपघात झाल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.