Mumbai Traffic: मोठी बातमी! येत्या १ फेब्रुवारीपासून मुंबईतील वाहतूक नियम बदलणार; दंडासोबत थेट वाहन जप्तीची कारवाई होणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2026 19:35 IST2026-01-29T19:33:32+5:302026-01-29T19:35:02+5:30
Mumbai Traffic Rules 2026: मुंबईकरांचा प्रवास आता सुसाट! मुंबई पोलिसांनी गर्दीच्या वेळी अवजड वाहनांना शहरात प्रवेश बंदी घातली आहे. सकाळी ७ ते ११ आणि संध्याकाळी ५ ते ९ दरम्यान नवीन नियम लागू. सविस्तर वाचा.

Mumbai Traffic: मोठी बातमी! येत्या १ फेब्रुवारीपासून मुंबईतील वाहतूक नियम बदलणार; दंडासोबत थेट वाहन जप्तीची कारवाई होणार
मुंबई: मुंबईतील दैनंदिन ट्रॅफिक जॅमच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी मुंबई वाहतूक पोलिसांनी एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता शहरात सकाळी आणि संध्याकाळी गर्दीच्या वेळी अवजड वाहनांना प्रवेश मिळणार नाही. या निर्णयामुळे दक्षिण मुंबई ते उपनगरांपर्यंतचा प्रवास अधिक वेगवान होण्याची शक्यता आहे.
मुंबई पोलीस आयुक्तालयाने जारी केलेल्या नवीन नियमांनुसार, अवजड वाहनांवर खालीलप्रमाणे निर्बंध घालण्यात आले आहेत:
सकाळची वेळ: सकाळी ७:०० ते सकाळी ११:०० वाजेपर्यंत शहरात एन्ट्री बंद.
संध्याकाळची वेळ: संध्याकाळी ५:०० ते रात्री ९:०० वाजेपर्यंत अवजड वाहनांना बंदी.
कुठे लागू होणार? मुंबईतील सर्व प्रमुख रस्ते, उड्डाणपूल आणि एक्सप्रेस-वे वर हे नियम लागू असतील.
सर्वसामान्यांचा प्रवास सुसह्य होणार
मुंबईत ऑफिस सुटण्याच्या आणि भरण्याच्या वेळेत अवजड ट्रक आणि ट्रेलरमुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होते. अनेकदा अरुंद रस्त्यांवर ही वाहने अडकल्याने किलोमीटरपर्यंत रांगा लागतात. नवीन निर्णयामुळे बस, दुचाकी आणि कार चालकांना मोठा दिलासा मिळणार असून प्रवासाचा वेळ किमान २० ते ३० मिनिटांनी वाचण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
अत्यावश्यक सेवांना सूट
या नियमातून रुग्णवाहिका, अग्निशमन दल, दूध आणि भाजीपाला पुरवणारी वाहने तसेच पाणीपुरवठा करणाऱ्या टँकर्सना वगळण्यात आले आहे. मात्र, इतर सर्व व्यावसायिक अवजड वाहनांना या वेळांचे काटेकोरपणे पालन करावे लागेल. नियम मोडल्यास अवजड दंड आणि वाहन जप्तीची कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.