Mumbai Water Cut: मुंबईत १० टक्के पाणी कपातीचे संकट, १ मे पासून कपात लागू होण्याची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2026 13:32 IST2026-04-16T13:31:43+5:302026-04-16T13:32:05+5:30
Mumbai Water Supply Cut News: गेल्या काही दिवसांपासून तापमानात होत असलेल्या वाढीमुळे मुंबईकरांवर पाणी कपातीचे संकट ओढवण्याची शक्यता आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाण्याचे वाढत्या उष्णतेमुळे मोठ्या प्रमाणावर बाष्पीभवन होत असल्याने पाणीसाठ्यात घट होत आहे.

Mumbai Water Cut: मुंबईत १० टक्के पाणी कपातीचे संकट, १ मे पासून कपात लागू होण्याची शक्यता
Mumbai Water Crisis: गेल्या काही दिवसांपासून तापमानात होत असलेल्या वाढीमुळे मुंबईकरांवर पाणी कपातीचे संकट ओढवण्याची शक्यता आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाण्याचे वाढत्या उष्णतेमुळे मोठ्या प्रमाणावर बाष्पीभवन होत असल्याने पाणीसाठ्यात घट होत आहे. त्यामुळे १ मेपासून पाणीपुरवठ्यात १० टक्के कपात करण्याचा प्रस्ताव पाणी खात्याने आयुक्तांना सादर केल्याचे सूत्रांनी सांगितले.
यंदा कमी पावसाचा अंदाज व्यक्त होत असतानाच वाढत्या उन्हामुळे पाणी कपातीलाही तोंड देण्याची परिस्थिती ओढवण्याची शक्यता आहे. धरणातील पाणीसाठ्यात वेगाने घट होत असल्याने पिण्याच्या पाण्याचे नियोजन करण्यासाठी १० टक्के पाणी कपात करण्याचा प्रस्ताव आयुक्तांकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे, पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.
ऑगस्टपर्यंत पाणीपुरवठा करण्यासाठी कपातीचा प्रस्ताव
मुंबईत ७ जूनपर्यंत वरुणराजाचे आगमन होते. मात्र, वातावरणीय बदलांमुळे पाऊस लांबणीवर पडल्यास मुंबईकरांना ऑगस्टपर्यंत योग्य प्रमाणात पाणीपुरवठा करता यावा यासाठी नियोजनाचा भाग म्हणून पाणी कपात करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.
मोडक सागर, मध्य वैतरणा, अपर वैतरणा, तानसा भातसा तुळशी व विहार या सात धरणांतून मुंबईला दररोज ४,१०० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होतो. मुंबईची वर्षभराची तहान भागविण्यासाठी वर्षाला १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर पाण्याची गरज भासते.
‘अल-निनो’मुळे निर्देश
दरवर्षी मान्सूनचा अंदाज लक्षात घेऊन जुलैअखेरपर्यंत पाणीपुरवठ्याचे नियोजन केले जाते. मात्र, यंदा अल-निनोच्या प्रभावामुळे राज्य सरकारने ऑगस्टपर्यंतचे नियोजन करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे १ मेपासून १० टक्के कपात केली, तरच ऑगस्टपर्यंत पाणीपुरवठा सुरळीत ठेवता येईल, असे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.
असा आहे धरणातील पाणीसाठा ( दशलक्ष लिटर)
१५ एप्रिल २०२६ पर्यंतचा
अपर वैतरणा - ७७,०४५
मोडक सागर - ४५,३४०
तानसा - ४०, ८१७
मध्य वैतरणा - ६९,१०६
भातसा - २,३५,४३९
विहार - १५,३५३
तुळशी - ३,२७४
इतका साठा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांमध्ये असून, तो ७ जुलैपर्यंत मुंबईकरांची तहान भागविण्यासाठी पुरेसा आहे.